ज्ञानदीपाचा दशकपूर्ती सोहळा
साने गुरुजी स्पर्धा परीक्षा केंद्राने ग्रामीण युवकांच्या स्वप्नांना दिली यशाची पंखे
अमळनेर प्रतिनिधी :
अमळनेरच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेत आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा दहावा वर्धापन दिन प्रेरणा, विचार आणि ज्ञानसंस्कृतीचा उत्सव ठरला. गेल्या दशकभरात ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अधिकारी होण्याची स्वप्ने चेतविणाऱ्या या केंद्राने आपल्या कार्यातून समाजात एक नवा आदर्श निर्माण केला आहे.
शुक्रवार, दि. ८ मे रोजी झालेल्या या सोहळ्यात विद्यार्थी, शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. स्वागतगीताच्या सुरांनी वातावरणात जणू ज्ञान, संस्कार आणि संवेदनांचा मधुर स्पर्श निर्माण झाला.
कार्यक्रमाच्या विचारपीठावर दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे, वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ, माजी चिटणीस,साहित्यिक भाऊसाहेब देशमुख कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी संदीप पाटील पत्रकार ईश्वर महाजन होते
---
विचारांना शब्दांची धार; वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांची प्रभावी मांडणी
एआय, विश्वगुरू भारत आणि मानवी भविष्यावर तरुणाईचा चिंतनशील संवाद
वर्धापन दिनानिमित्त आयोजित वकृत्व स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आधुनिक काळातील गंभीर आणि भविष्यवेधी विषयांवर अभ्यासपूर्ण विचार मांडले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एआय, विश्वगुरू भारत आणि एआय आणि मानवी भविष्य या विषयांवर विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले विचार उपस्थितांना विचारप्रवृत्त करून गेले.
या स्पर्धेत कल्पेश पाटील प्रथम, कुशल भदाणे द्वितीय तर मयूर गजानन पाटील तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. सामान्य ज्ञान परीक्षेत पुष्पराज पाटील, विनायक गुरव आणि घनश्याम नेरकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला.
---
छोट्या रोपट्याचा आज वटवृक्ष
मोफत मार्गदर्शनातून ७८ विद्यार्थी विविध पदांवर; संदीप पाटील यांचा भावनिक आढावा
कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक संदीप पाटील यांनी केंद्राच्या दशकभराच्या प्रवासाचा हृद्य आढावा घेतला.
दहा वर्षांपूर्वी रुजवलेले हे छोटेसे रोपटे आज वटवृक्ष झाले आहे. या केंद्रातून ७८ विद्यार्थी विविध शासकीय पदांवर पोहोचले आहेत, असे सांगताना त्यांच्या शब्दांत समाधान आणि अभिमान दाटून आला होता.
आजच्या काळात मोफत काही मिळत नाही; मात्र हे केंद्र विद्यार्थ्यांना पूर्णतः नि:शुल्क मार्गदर्शन देत आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ही एक सामाजिक चळवळ आहे, असे ते म्हणाले.
---
यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव; संघर्षांना मिळाले सन्मानाचे पंख
आर्मी, पोलीस, मेट्रो आणि न्यायव्यवस्थेत निवड झालेल्यांचा सत्कार
या प्रसंगी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्ञानेश्वर पाटील (आर्मी), कल्पेश पाटील (पोलीस भरती), मंगेश पाटील (सेशन कोर्ट), गीतांजली पाटील (पोलीस सेवा) यांच्यासह अनेक गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सहकार्य करणाऱ्या दीपक वाल्हे व पत्रकार अजय भामरे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
---
समाजासाठी वेळ देणे हीच खरी समाजसेवा दत्तात्रय निकम
वाचन, सातत्य आणि प्रामाणिकपणातूनच घडतो खरा विद्यार्थी
प्रमुख अतिथी पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला.
स्वतःसाठी जगणारे अनेक असतात; पण समाजासाठी वेळ देणारे फार कमी असतात. विजयसिंह पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कार्य ही खरी समाजसेवा आहे, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षेत सातत्य, प्रामाणिक मेहनत आणि वाचनाची सवय विद्यार्थ्याला केवळ अधिकारीच नव्हे तर चांगला माणूस बनवते, असेही त्यांनी नमूद केले.
---
वाचन विचार देतं, विचार दिशा देतो अशोक बि-हाडे
विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करण्यासाठी मेहनत आणि दृष्टिकोन बदलण्याची गरज
मा. गटशिक्षणाधिकारी अशोक बि-हाडे यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रेरणादायी विचार मांडताना वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित केले.
आज विद्यार्थ्यांकडे साधने, तंत्रज्ञान आणि संधी विपुल प्रमाणात आहेत; पण त्या संधीचे सोने करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि योग्य दिशा आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन, चिंतन आणि व्यक्तिमत्त्व विकासाचा मंत्र दिला.
---
यशाला शॉर्टकट नसतो भाऊसाहेब देशमुख
३५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्याचे उदाहरण देत वाचन संस्कृती जपण्याचे आवाहन
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्यिक भाऊसाहेब देशमुख यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना जीवनमूल्यांचा संदेश दिला.
यश मिळवायचे असेल तर स्वतःला पूर्णतः झोकून द्यावे लागते. वाचन हीच माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची खरी श्रीमंती आहे, असे सांगताना त्यांनी नववीतील मयूर गजानन पाटील या विद्यार्थ्याने ३५० पुस्तके वाचल्याचे उदाहरण दिले.
---
विद्यार्थ्यांनी मानसिकता बदलली पाहिजे विजयसिंह पवार
स्पर्धा परीक्षेकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन
स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक विजयसिंह पवार यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर परखड भाष्य केले.
विद्यार्थी केवळ पोलीस भरतीपुरते मर्यादित राहतात; पण इतर अनेक स्पर्धा परीक्षांकडेही गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
दर रविवारी मार्गदर्शक वेळ देतात, लाखो रुपये खर्च होतात; मात्र विद्यार्थ्यांनी सातत्य आणि जिद्द ठेवली पाहिजे. भारतातील पहिले विनामूल्य स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून या उपक्रमाची ओळख निर्माण व्हावी, ही आमची इच्छा आहे, असे त्यांनी सांगितले.
---
परिपूर्ण ठोकळा पुस्तकाचे प्रकाशन
विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला दिशा देणाऱ्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
यावेळी संदीप पाटील लिखित परिपूर्ण ठोकळा या स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांचा वाढदिवसही उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिन आणि वाढदिवसाच्या दुहेरी आनंदाने वातावरण अधिकच उत्साही झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया परदेशी आणि कुशल भदाणे यांनी प्रभावीपणे केले. शेवटी विजयसिंह पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.