कपास क्रांती प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी गट व संस्थांनी ऑनलाइन अर्ज करावेत
कपास क्रांती’ प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी गट व संस्थांनी ऑनलाइन अर्ज करावेत
कापूस उत्पादकता वाढीसाठी नवनिर्मिती केंद्र पुरस्कृत योजनेचे आवाहन
नांदेड, दि. ८ जून : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, कापूस पिकाची उत्पादकता व गुणवत्ता सुधारणे तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने नवनिर्मिती केंद्र पुरस्कृत “कापूस उत्पादकता अभियान (कपास क्रांती) – MCP” योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत विविध पीक प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येत असून पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
यंदा संभाव्य अल-निनो परिस्थितीचा विचार करून कपाशीची लागवड बेड पद्धतीने करणे तसेच मुलस्थानी जलसंधारण उपाययोजना राबविण्यावर भर देण्यात आला आहे. योजनेअंतर्गत क्लोजर स्पेसिंग (CS) पद्धतीने कापूस लागवड (९० x ३० सेमी.), सघन कापूस लागवड (HDPS) (९० x १५ सेमी.) तसेच एकात्मिक पीक व्यवस्थापन (ICM) (९० x ६० सेमी.) या तंत्रज्ञानांची प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.
एकात्मिक पीक व्यवस्थापनांतर्गत कपाशीसोबत मूग व उडीद या आंतरपिकांचा समावेश करण्यात आला आहे. या पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते तसेच शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध होतो. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक विविधीकरणामुळे जोखीम कमी करण्यासही मदत मिळते.
क्लोजर स्पेसिंग आणि सघन कापूस लागवड तंत्रामुळे प्रति हेक्टर झाडांची संख्या वाढून अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता असते. तसेच संतुलित खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग नियंत्रण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या योजनेसाठी अर्जाची सुविधा महाडीबीटी पोर्टल (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin) वर उपलब्ध आहे. जिल्ह्यातील पात्र शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी क्षेत्रातील सहकारी संस्थांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेत.
मागील दोन वर्षांत पीक प्रात्यक्षिक योजनेचा लाभ घेतलेल्या गटांची यावर्षी निवड करण्यात येणार नाही. तसेच शेतकरी गट किंवा कंपनीमधील फार्मर आयडीधारक सदस्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
अधिक माहितीसाठी संबंधित सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.