शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान पहीला उपक्रमाचा १ जून रोजी संगीत विद्यालयाच्या भूमिपूजनाचा अबीतखिंड (भोजनेवाडी) ये सोहळा....
अकोले तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोतुळ परिसरातील अबीतखिंड (भोजनेवाडी) येथे शरद प्रतिभाशाली सांस्कृतिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संगीत विद्यालयाच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. १ जून रोजी सकाळी १० वाजता शहीद राजेंद्र भोजने पटांगण, अबीतखिंड (भोजनेवाडी) येथे पार पडणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने यांनी दिली.
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना संगीत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘तालुका तिथे संगीत विद्यालय’ ही संकल्पना शरद प्रतिभाशाली प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत आहे. त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून अबीतखिंड (भोजनेवाडी) येथे संगीत विद्यालयाची उभारणी करण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी स्थानिक ग्रामस्थांनी पुढाकार घेत तब्बल सात गुंठे जागा दान केली आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून जमीन दान करणाऱ्यांमध्ये रामनाथ भोजने, मुकींदा भोजने, धोंडिभाऊ भोजने, वाळीबा भोजने, किसन भोजने तसेच स्वर्गीय रंगनाथ भोजने, स्वर्गीय बुधाबाई भोजने, स्वर्गीय पांडुरंग भोजने आणि स्वर्गीय रावजी भोजने यांचा विशेष उल्लेख होत आहे.
या पहिल्या भूमिपूजन सोहळ्यास राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे, उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष भावना घाणेकर, आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव देवराम मुंढे, निसर्ग व सामाजिक पर्यावरणचे प्रमोद मोरे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजारामबुवा शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार असून या सोहळ्यास प्रतिष्ठानचे राज्य पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या मंगल प्रसंगी परिसरातील नागरिक, ग्रामस्थ व संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष रामनाथ भोजने यांच्या वतीने करण्यात आले आहे.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी संगीत शिक्षणाची दारे खुली करणारा हा उपक्रम भविष्यात अनेक गुणी कलाकार घडविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.