समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या तृतीयपंथीयाच्या गळ
मनमाड। असं म्हटलं जातं की 'प्रेम हे आंधळं असतं' अशाच एका आगळेवेगळे प्रेमाचे रुपांतर लग्नात झाल्याची सुख:द आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी घटना मनमाड शहरात समोर आली आहे. समाज आणि लोक काय म्हणतील याच्या पलीकडे जावून एका तरुणाने त्याची प्रेयसी असलेल्या तृतीयपंथीयाच्या गळ्यात मित्र आणि घरातील मंडळीच्या उपस्थित आणि साक्षीने वरमाला घालून मंगळसूत्र बांधले.
हा आगळावेगळा विवाह सध्या मनमाड शहर परिसरातच नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला असून या नव दाम्पत्याला दोन्ही कडच्या लोकांनी शुभ आशिर्वाद दिले आहे. या लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.या बाबत अधिक माहिती अशी की, मनमाड शहरातील तृतीयपंथी महंत शिवलक्ष्मी आणि येवला तालुक्यातील तरुण संजय झाल्टे यांची टिकटॉक या सोशल मीडियावर व्हिडीओ बघून ओळख झाली. त्यानंतर दोघे एकमेकाशी गप्पागोष्टी करत असताना दोघे एकमेकांच्या प्रेमात कधी पडले.
हे त्यांना देखील कळले नाही.दोघातील प्रेमाचे नाते इतके घट्ट झाले की, एक दिवस देखील त्यांची भेट नाही झाली तर दोघे ही अस्वस्थ व्हायचे. त्यामुळे दोघांनी लग्न करण्याचा निश्चय केला. मात्र समाज आणि लोक काय म्हणतील असा विचार शिवलक्ष्मीच्या मनात आला. मात्र 'मी लग्न करेल तर फक्त तुझ्यासोबत अन्यथा करणार नाही' असा हट्ट संजयने धरला.सर्वात मोठी अडचण होती ती दोघांच्या घरातील मंडळीची मात्र दोघांनी आपापल्यापरीने प्रयत्न करून घरच्या लोकांना पटवून दिले. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही, त्यांचे प्रेम पाहून अखेर दोघांच्या परिवारातील सदस्यांनी लग्नाला होकार दिला. त्यानंतर महंत शिवलक्ष्मी संजय झाल्टे या दोघांचा मनमाडपासून जवळ असलेल्या नागापूर येथील नागेश्वर महादेव मंदिरात लग्नसोहळा पार पडला. यावेळी दोघांच्या घरातील काही मंडळी आणि मोजके मित्र उपस्थित होते.