दिव्या शिंदे च्या बाबततीत आमची भूमिका स्पष्ट आहे.
हा मुद्दा कुठल्या एका व्यक्तीपुरता किंवा एका कार्यक्रमापुरता मर्यादित नाही
हा मुद्दा आहे सांस्कृतिक शोषणाचा, वैचारिक बहिष्काराचा आणि भांडवलशाही–ब्राम्हणवादी माध्यमांच्या दुटप्पी धोरणाचा.
आज जे काही घडत आहे, ते योगायोग नाही.
हे ठरवून केलेलं आहे.
आम्ही म्हणजे लोकांचा सिनेमा चळवळ (People's Movie Movement) नी या पत्रकार परिषदेसाठी पुढाकार घेतला आहे, कारण आमची चळवळ ही केवळ प्रतिक्रिया देणारी नाही, तर प्रश्न उचलणारी आहे."चल हल्ला बोल "सिनेमाच्या वेळी सेन्सॉर बोर्डाला हदरवून सोडलेल्या घटना तुम्हाला माहित आहेतच.
आम्ही गप्प बसलो, तर उद्या आमच्यातील प्रत्येक कलाकार, लेखक, विचारवंत याच पद्धतीने “वापरा आणि फेका” या धोरणाचा बळी ठरेल.
आजच्या मुख्य प्रवाहातील, कारपोरेट आणि ब्राम्हणवादी माध्यमांमध्ये आंबेडकरवादी, बहुजन आणि मेहनती कलाकारांना स्थान दिलं जात नाही.
जोपर्यंत त्यांची गरज आहे, तोपर्यंत त्यांचा वापर केला जातो.
जेव्हा त्यांचा फॅनफॉलोअर वाढतो, टीआरपी मिळते, लोकप्रियता मिळते —
तेव्हा त्यांना स्वीकारलं जातं.
पण ज्या क्षणी त्या कलाकारांची ओळख, विचार, आत्मसन्मान आणि वैचारिक भूमिका ठळकपणे समोर येते,
त्या क्षणी त्यांना “थातूरमातूर कारणं” देऊन बाहेर काढलं जातं.
हे केवळ अन्याय नाही —
हे सांस्कृतिक शोषण आहे.
दिव्या शिंदे यांना काढून टाकण्यामागे दिली गेलेली कारणं ही वरवरची आहेत.
खरं कारण हे आहे की —
त्या एका ठराविक चौकटीत बसत नाहीत.
त्या स्वतंत्र विचार मांडतात.प्रश्न विचारतात.
त्या आंबेडकरवादी आहेत.
आणि हेच या व्यवस्थेला खुपतं.
महापुरुषांची नावं पुढे करून, संस्कृतीचा आव आणून,
आणि प्रत्यक्षात बहुजन कलाकारांना बाहेर काढणं —
हा दांभिकपणा आम्ही स्वीकारणार नाही.
आमची चळवळ ही वैदिक वर्चस्वाच्या विरोधात आणि बौद्धिक–आंबेडकरवादी विचारांच्या बाजूने उभी आहे.
ही लढाई व्यक्तीविरोधात नाही,
ही लढाई व्यवस्थेविरोधात आहे.
आज दिव्या शिंदे आहेत,
उद्या दुसरी कोणीतरी असेल.
म्हणूनच आज आम्ही हा मुद्दा उचलला आहे.
आम्ही स्पष्ट सांगतो —
आमच्या कलाकारांचा वापर करून टीआरपी वाढवायची आणि मग त्यांना फेकून द्यायचं, हे चालणार नाही.
- महेश बनसोडे
लेखक, दिग्दर्शक, निर्माता.
लोकांचा सिनेमा अध्यक्ष
अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ संस्थापक सचिव.