logo

जिल्ह्यातील शेती, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रासाठी हजारो कोटी. जिल्ह्याचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही : आमदार राणाजगजितसिंह पाटील

प्रतिनिधी : विकास वाघ धाराशिव.
कृष्णा खोऱ्यातील हक्काचे पाणी जिल्ह्यात दाखल होत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी १८ हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रस्तावित आहे. तीर्थक्षेत्र तुळजापुरात २००० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्य सरकार करीत आहे. नळदुर्ग येथे देशातील पहिले पर्यटन विद्यापीठ होणार आहे. तेर, येडशी येथील रामलिंग अभयारण्य याठिकाणी पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात कामे सुरू केली आहेत. कौडगाव, वडगाव, माळुंब्रा, वाशी याठिकाणी एमआयडीसीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपला भर आहे. एकंदरीत पुढील काळात धाराशिव हा केवळ कृषिप्रधान म्हणून नाही तर उद्योग आणि पर्यटन व्यवसायाचे केंद्र म्हणून ओळखला जाईल असा ठाम निर्धार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.



कोंड येथील सभेत धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी हाती घेतलेल्या विविध विकास प्रकल्पांची सविस्तर माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. जिल्ह्यातील शेतीमध्ये आमूलाग बदल झाले आहेत. आपल्या जिल्ह्यात ३० वर्षांपूर्वी उसाचे क्षेत्र नगण्य होते, मात्र डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे आज जिल्ह्यात ४० टक्के क्षेत्र बागायती झाले असल्याचे त्यांनी सांगितले. कृष्णा खोऱ्यातील आपल्या हक्काचे २३.६६ टीएमसी पाणी डॉ. पद्मसिंह पाटील साहेबांनी राजकीय वर्चस्व पणाला लावून मंजूर करून घेतले. येत्या महिन्यात हे पाणी तुळजाभवानी मातेच्या चरणी असलेल्या रामदरा तलावात पोहोचणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील पाण्याचा प्रश्न आता कायमचा सुटणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.



कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे ५० टीएमसी पाणी बोगद्याद्वारे मराठवाड्यात आणले जाणार आहे. मित्र या संस्थेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ही मोठी जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. त्यासाठी १८ हजार कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून सहकार्य मिळणार आहे. त्याचा व्यवहार्यता अहवालही सकारात्मक आला आहे. उजनी धरणात जेवढे पाणी आहे त्याच्या निम्मे पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून उपल्ब्ध होणार आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.



जिल्ह्यात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्याने आपण उद्योग आणि पर्यटनावर लक्ष केंद्रित केले आहे. तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मंदिराच्या परिसराचा २ हजार कोटी रुपये खर्चून कायापालट केला जात आहे. सध्या दीड कोटी भाविक दरवर्षी आईच्या दर्शनासाठी येतात. पुढील काळात ही संख्या पाच कोटींवर नेण्याचे आपले उद्दिष्ट आहे. त्यातून स्थानिकांना मोठा रोजगार मिळणार असून मोठी गुंतवणूकही या भागात वाढणार आहे. तेर येथील प्राचीन वैभवशाली वारसा आणि तीर्थक्षेत्र रामलिंग अभयारण्यात १८ कोटींच्या गुंतवणुकीतून पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथे एक हजार एकरवर 'तारा' प्रकल्प, वडगाव सिद्धेश्वर येथे लघुउद्योजकांसाठी भूखंड आणि वाशी येथे नवीन एक हजार एकरची एमआयडीसी उभारली जात आहे. धाराशिव ते सोलापूर या रेल्वे कामासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने ५० टक्के निधी देण्यास नकार देऊन अडथळा निर्माण केला होता. त्यामुळे हा प्रकल्प अडीच वर्ष रखडला. मात्र आपले महायुती सरकार येताच निधी उपलब्ध करून काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. लवकरच तुळजाभवानी मातेच्या चरणी तुळजाभवानी एक्सप्रेस रेल्वेगाडी धावताना आपल्याला पहायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 'लखपती दीदी' योजनेअंतर्गत महिलांना ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, वीज बिल माफी आणि भविष्यात शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवण्यासाठी सौर ऊर्जेवर भर दिला जात आहे. गायरान जमिनीवरील अतिक्रमणे नियमित करून तेथे घरकुल देण्याचा निर्णयही आपल्या सरकारने घेतला

असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.





केंद्रात, राज्यात आपले सरकार असल्याने निधी कमी पडणार नाही : आमदार राणाजगजितसिंह पाटील



जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत आपल्या भाजपाची सत्ता आल्यानंतर जिल्ह्यातील सर्व विकास कामांना आणखी गती मिळणार आहे. होऊ घातलेल्या नव्या प्रकल्पांच्या मंजुरी आणि निधी उपलब्धतेलाही वेग लाभणार आहे. सर्वांच्या सहकार्याने सुरू केलेला विकासकामांचा हा अश्वमेघ रथ पुढे नेण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य अत्यंत आवश्यक आहे. पालिका आणि महापालिका निवडणुकीत ज्याप्रमाणे महायुतीला निर्विवाद विजय मिळाला अगदी त्याप्रमाणेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले.

0
0 views