logo

लावणीला आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत.लावणी बदलतेय. लोक कलावंतांसाठी कल्याणकारी बोर्ड झालंच पाहिजे......


लावणीला आता पूर्वीचे दिवस राहिले नाहीत.लावणी बदलतेय.खेड्यापाड्यात, तालुक्याला जत्रा खत्रांमध्ये लावणी डीजेच्या तालावर थीरकु लागलेय.नव्या जुन्या हिंदी मराठी गाण्यांवर उगाच भेसूर आणि बेसूर पावलं ओढत कशीबशी टिकून राहण्याचा अट्टहास करू पाहतेय.अस्सल लावणी कलावंत अडगळीत पडल्यासारखे साइड ट्रॅक होऊ लागलेत.कधी लावणीच्या प्रेमापोटी तर कधी पोट भरण्यासाठी का होईना,कलावंतांना पण बदलणं भाग पडतंय.लावणीच्या नावावर पडेल ते काम करावं लागतंय.आता दुसरा धंदा तरी कुठला जमणार ?
. अधून मधून पुण्या मुंबई सारख्या शहरात लावणी महोत्सवाची झ्याक पाक दिसते.पण ती तरी कितीशा कलावंतांच्या नशिबात असते ?अशात जो काही थोडाफार सहारा मिळू शकतो तो सरकार कडूनच.म्हणूनच सरकारने वेळीच लावणी कलावंतांचे कल्याणकारी बोर्ड स्थापन करून लावणी आणि लावणी कलावंत यांना आधार दिला पाहिजे.अनेक कलावंतांकडे आपल्या कारकिर्दीचे कागदोपत्री पुरावे नाहीत.शासन दरबारी त्यांची होणारी कोंडी थांबवली पाहिजे.मुंबई आणि उपनगरात अस्तित्वात नसलेली शासकीय कलावंत कल्याण समिती त्वरित नेमली गेली पाहिजे.कलावंताची उपेक्षा संपून त्यांना योग्य तो सन्मान आणि मानधन वेळेवर मिळाले पाहिजे.लावणी कलावंत महासंघ आणि इतर अनेक संघटना कधीतरी एकत्रपणे तर कधी स्वतंत्रपणे याच मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहेत..
धारावीत लहानाचे मोठे झालेले हरहुन्नरी कलावंत संतोष लिंबोरे पाटील याच ध्येयाने पछाडलेत.साधारण अकरा वर्षांपूर्वी त्यांच्या पुढाकाराने लावणी कलावंत महासंघाची स्थापना करण्यात आली.लिंबोरे यांच्या सोबत जयेश चाळके,कविता घडशी,चंद्रकात बारशिंगे, योगिता मोर्जे,आदींची टीम होती आणि आजही आहे.धारावीतील जेष्ठ पत्रकार संजय शिंदे यांच्या सारखे दोस्त ही सोबत उभे राहिले.नव्या दमाच्या कार्यकारिणीत विशाल सदाफुले,विजय कर्जावकर,नम्रता वेस्वीकर,स्नेहल परबते,संदेश गायकवाड अशी अनेक तरुण मंडळी पुढे सरसावलीत. नुकताच शिवाजी मंदिर इथे संघटनेचा अकरावा वर्धापन दिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.लोक कलावंतांच्या अनेक संघटना,अनेक मान्यवर यात आवर्जून सहभागी झाले होते.राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांना कलावंतांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्यांनीही नेहमीप्रमाणे लवकरच निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.
सरकार कधी निर्णय घ्यायचा तो घेईल.पण सामान्य जनतेने तरी या लोक कलावंतांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
आणखी एक महत्त्वाचं.पारंपरिक लोक कलावंतांनी नव्या युगाच्या नव्या पायवाटा, नव नवे शिक्षण, नवे तंत्र आत्मसात करायच्या मागे लागलं पाहिजे.
काळ बदललाय.तुम्हालाही बदलावे लागेल !

98
3306 views