
मान्सूनपूर्व तयारीसह हरित धाराशिव मोहिमेसह विकास योजनांची
प्रभावी अंमलबजावणी करा
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
(प्रतिनिधी:- विकास वाघ धाराशिव) जिल्ह्यात मान्सूनपूर्व तयारी करण्यासोबतच वृक्ष लागवड मोहिमेतून हरित धाराशिव करतांना सर्वांना सहभागी करून घेऊन विविध विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी.असे निर्देश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
आज भूम येथील सावित्रीबाई फुले सभागृहात आपत्ती व्यवस्थापन,हरित धाराशिव यासह विविध योजनांचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी श्री.पुजार बोलत होते.या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलीस अधीक्षक रितू खोकर,भूमच्या उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील,भूम तहसीलदार श्री.पाटील व परंडा तहसीलदार श्री.कुकडे यांच्यासह दोन्ही तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक त्या खबरदारीच्या सूचना यावेळी श्री.पुजार यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.तसेच विकास योजना,गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेसह जलतारा योजनेच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला."प्रत्येक एकरासाठी एक जलतारा खड्डा" हे उद्दिष्ट असल्याचे सांगून त्यानुसार कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
हरित धाराशिव मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात ५० लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे सांगून श्री.पुजार म्हणाले की,येत्या १९ जुलै २०२५ रोजी एकाच दिवशी १५ लाख वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे.यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत शासकीय जमिनीपैकी किमान १० आर जमीन मशागत करून वृक्ष लागवडीसाठी तयार करावी तसेच या अभियानात नागरिक,बचत गट महिला,अंगणवाडी कार्यकर्त्या,ग्रामपंचायत कर्मचारी,क्षेत्रीय कर्मचारी व सर्व विभाग प्रमुख यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी यावेळी केले.
रस्ते योजनांना चालना अभिसरणातून देण्यात यावी असे सांगून श्री.पुजार यांनी शेतरस्ते,पाणंद रस्ते,अतिक्रमणमुक्त मार्ग तयार करण्यासाठी जिल्ह्याचे २ हजार किमीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ग्रामपंचायतीमार्फत ठराव घेऊन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.या योजनेंतर्गत लाभार्थ्यांचा वाटा ४८ हजार रुपये असून शासनाकडून प्रत्येकी १ किमी रस्त्यासाठी १ लक्ष रुपये अनुदान मिळणार आहे.शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असेही आवाहन श्री.पुजार यांनी केले.