logo

गंगामाई हाॅस्पीटलच्या संयुक्त विद्यमाने हाडांच्या व मेंदूच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत शिबीर संपन्न


धाराशिव (जिल्हा प्रतिनिधी) धाराशिव येथील आरोग्य क्षेत्रात सतत कार्यरत असलेल्या तुलसी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व सोलापूर येथील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. प्रभाकर त्यांच्या गंगामाई हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हाडांच्या आणि मेंदूच्या आरोग्य तपासणीसाठी मोफत शिबिराचे आयोजन धाराशिव येथील बालाजी मंदिर येथे रविवार दिनांक २३ मार्च २०२५ रोजी करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
या आरोग्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने संपूर्ण तपासण्या केल्या. हाडांचे तज्ञ डॉ. रुपेश कदम व न्यूरोलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट डॉ. निखिल तडवळकर यांच्या विशेष उपस्थितीमध्ये नागरिकांना तपासणी व उपचारांसह आवश्यक ती वैद्यकीय माहिती दिली. त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन करताना हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचे महत्त्व, योग्य आहार आणि व्यायामाच्या पद्धती सांगितल्या. मेंदूच्या आरोग्यासाठी ध्यान, योग, सकारात्मक विचार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व विशद केले.या शिबिरात हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारे तपासणीचे विविध प्रकार, जसे की बोन डेन्सिटी तपासणी (BMD), ऑस्टिओपोरोसिस तपासणी, सांध्यांचे परीक्षण आणि स्नायूंची ताकद तपासणी करण्यात आली. तसेच, मेंदूच्या कार्यक्षमतेसंबंधित तपासण्या, स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) निदान, स्ट्रोकच्या लक्षणांची ओळख आणि मानसिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिराचे उद्घाटन तुलसी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष श्री नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आणि आरोग्यविषयक जनजागृतीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
सोलापूर येथील सुप्रसिद्ध गंगामाई हॉस्पिटल च्या वतीने यामध्ये डॉक्टर निखिल तडवळकर ( न्यूरो सर्जन ) व डॉक्टर रुपेश कदम ( एमएस आर्थो ) हे मणक्याचे आजार , कंबर दुखी , हात व पायांना मुंग्या येणे , सतत डोके दुखणे, चक्कर येणे , मान दुखी, आदीसह संधिवात, मनगट व टाचदुखी , गुडघेदुखी हाडांची ठिसूळता आदि विविध आजारांवर मोफत तपासणी करून उपचार केले.
रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक या निर्धारित वेळेत लाभ घ्यावा असे आवाहन तुलसी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे मा. जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केले होते. शिबिर उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, "सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक असून उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग आणि कामकाजातील ताणतणावाचा सामना करणाऱ्या व्यक्तींना या शिबिराचा विशेष लाभ झाला. भविष्यातही आम्ही अशा आरोग्यविषयक उपक्रमांच्या माध्यमातून समाजसेवा करत राहू."तसेच समाजातील तरुण व युवकांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहून एक प्रबळ,सदृढ,निरोगी, विकसित राष्ट्र निर्मितीच्या कार्याच्या संकल्पला हातभार लावावा, असे आवाहनही श्री. नितीन काळे यांनी यावेळी केले.
या शिबिरासाठी उपस्थित सर्व नागरिकांनी व रुग्णांनी संस्थेच्या या उपक्रमाचे आभार मानले आणि भविष्यात पुन्हा असे शिबिरे आयोजित करण्याची विनंती केली. यावेळी डॉ. अंजली काळे, संदीप अंधारे, देवा नायकल, मेसा जानराव यांच्यासह मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.

12
1068 views