अनोरे गावात द्वितीय सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती कार्यक्रम !.
जाती - जातीत विभागून महापुरुषांच्या विचारांची माती करू नका : पी डी पाटील ( जिल्हाध्यक्ष सत्यशोधक समाज संघ )
अनोरे गावात यापुढे सर्व विधी सत्यशोधक पद्धतीने होणार : हरी महाजन ( माळी समाजाध्यक्ष ]
धरणगांव - ८ जुन सोमवार रोजी पारंपारिक प्रथांना फाटा देत सत्यशोधक विचारांनी प्रेरित होऊन धरणगाव तालुक्यातील अनोरे गावाचे सामाजिक कार्यकर्ते राजाराम व प्रधान चिंधु महाजन यांच्या भगिनी निसर्गवासी सुमनबाई महाजन यांचा दशपिंडविधी, गंधमुक्त व उत्तरकार्याचा कार्यक्रम सत्यशोधक पद्धतीने पार पडला. सर्वप्रथम संत, महापुरुष व महामातांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सत्यशोधक पद्धतीने विधी करत असताना सत्यशोधक समाजाची प्रार्थना सत्यशोधक विधीकर्ते शिवदास महाजन यांनी म्हटली.
याप्रसंगी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील यांनी अंधश्रद्धा व कर्मकांडाला दुर सारून सत्यशोधक विचारांची कास धरावी. महापुरुषांना जाती - जातीत विभागून त्यांच्या विचारांची माती करू नका. हीच खरी तात्यासाहेब फुले व सावित्रीमाई यांना आदरांजली असेल असे प्रतिपादन पाटील यांनी केले. आदर्श शिक्षक रमेश गुरुजी यांनी शोकसंदेश वाचन करून मनोगत व्यक्त करून भावपूर्ण आदरांजली व्यक्त केली. सत्यशोधक विधीची प्रेरणा सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार, सचिव डॉ. सुरेश झाल्टे यांच्याकडून मिळाली. याप्रसंगी सर्व महिलांना महापुरुषांचे अनमोल ग्रंथ भेट देण्यात आले. परिवाराच्या माध्यमातून शेतात, परिसरात लिंब , पिंपळ,वड या वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. संपत्तीवरून आम्ही भावंडे कधीही भांडणार नाही अशी सामूहिक शपथ घेतली.
याप्रसंगी गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष हरी तुकाराम महाजन, युवराज पाटील, रामकृष्ण पाटील, रमेश गुरुजी, प्रकाश महाजन, नवल महाजन, यासह गावातील सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता, क्रीडा, साहित्य, राजकीय, आप्तेष्ट मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.