धारावीतील शिवसेना नगरसेवकांनी अदानी कंपनी आणि डीआरपी विरोधात तक्रार दाखल केली
मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) आणि झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे (एसआरए) प्रमुख महेंद्र कल्याणकर यांनी धारावी झोपडपट्टीवासीयांची दिशाभूल करून धारावीतील शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसचे नगरसेवक यांना वेगळी भूमिका वृत्तपत्रांत मांडण्यासाठी कारणीभूत ठरल्याचा आरोप झाला आहे. या आरोपांवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे नगरसेवक संतप्त झाले असून त्यांनी महेंद्र कल्याणकर आणि अदानी कंपनीच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रा. लि.विरुद्ध धारावी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नगरसेवकांचा आरोप आहे की, कल्याणकर धारावीचा नव्हे तर अदानी कंपनीचा वेगाने विकास करण्याचा प्रयत्न करत आहेत.
धारावी बचाव आंदोलनाने लोकांना ५०० चौ.फू.ची घरे धारावीत मिळावीत यासाठी राज्य सरकार, एसआरए आणि डीआरपीकडून लेखी आश्वासन मागितले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या मोर्चानंतर महेंद्र कल्याणकर यांना निवेदन सादर केले गेले होते, परंतु दुसऱ्या दिवशी त्यांनी धारावीतील नगरसेवकांना वांद्रे येथील एसआरए कार्यालयात बोलावून डीआरपीला सहकार्य करण्याची भूमिका मांडली. मात्र, डीआरपी अपात्र लोकांना धारावीत घरे न देण्यावर ठाम असल्याने शिवसेना नगरसेवकांनी धारावीतील डीआरपीच्या शिबिरांना विरोध दर्शविला आहे. शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष सर्व धारावीकरांना पात्र मानून त्यांना धारावीतच घर देण्याची मागणी करत आहे. या सर्वात महेंद्र कल्याणकर आणि अदानी कंपनीवर धारावीकरांची दिशाभूल करण्याचा आरोप करण्यात आला आहे.
अदानी समूहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडमार्फत धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास सुरु आहे, मात्र नगरसेवकांचा आरोप आहे की महेंद्र कल्याणकर १२ लाख धारावीकरांच्या झोपड्यांचा विकास न करता केवळ अदानी कंपनीचा विकास करत आहेत. धारावीतील सर्व लोकांना ५०० चौ.फू.ची घरं देण्यासाठी लेखी हमी एसआरए, डीआरपी आणि राज्य सरकारने द्यावी, त्यानंतरच पात्रतेची पडताळणी करण्यासाठी शिबिरे घेण्याची मागणीही करण्यात आली आहे. या भूमिकेसाठी आमदार बाबुराव माने आणि महेश सावंत यांनी शिवसेना व काँग्रेसच्या नगरसेवकांचे अभिनंदन केले आहे.