वाशिम: अतिवृष्टी नुकसानीचा अहवाल लपवल्याचा शेतकऱ्याचा आरोप
वाशिम: कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूल प्रशासनावर आणि पीक विमा कंपन्यांवर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल लपवून शेतकऱ्यांना फसवण्याचा गंभीर आरोप केला आहे. महेश प्रकाश काळखे यांनी माहिती अधिकारांतर्गत मागवलेला अहवाल जाणीवपूर्वक दडवण्यात आल्याचे सांगितले असून, प्रशासनाने नुकसान न झाल्याचा खोटा अहवाल दिला असल्याचा आरोप केला आहे.
महेश काळखे यांनी ७ दिवसांत योग्य कारवाई न झाल्यास मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. त्यांनी तीन मुख्य मुद्दे उपस्थित केले आहेत; मुख्य अहवालाचा अभाव, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि शासन निर्णय फक्त विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी राबवले जात असल्याचा आरोप यामध्ये आहेत. शेतकऱ्यांनी न्यायालयात या भ्रष्टाचाराचा पुरावा मांडण्याची तयारी दर्शवली आहे.