कारंजा तालुक्यात पीक विमा घोळ; अधिकाऱ्यांचा खोटारडेपणा उघड
कारंजा (लाड) वाशिम : कारंजा तालुक्यातील उंबर्डा बाजार महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही अधिकाऱ्यांनी 'नुकसान झालेच नाही' असा खोटा अहवाल दिल्याचा आरटीआयमधून खुलासा झाला आहे. तहसीलदारांनी ५.५ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी शासनाकडे केली असतानाही स्थानिक मंडळ अधिकाऱ्यांनी नुकसान नोंदविणे टाळले. या दुटप्पीपणामुळे हजारो शेतकरी पीक विमा लाभापासून वंचित झाले आहेत.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सलग १० दिवस सुरू असलेल्या पावसानंतर उंबर्डा बाजारातील १५ गावांतील ५,९८४ शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपाशी आणि तुरी यांचे पीक उद्ध्वस्त झाले. तहसीलदारांनी प्राथमिक अहवालात २३,१३८ शेतकऱ्यांचे नुकसान नोंदवले होते. मात्र मंडळाचा खोटा अहवाल विमा कंपन्यांना आधार देत क्लेम फेटाळण्यास कारणीभूत ठरला आहे. शेतकरी आणि श्री एम एच लोकशक्ती फाउंडेशन यांनी तातडीने अधिकाऱ्यांवर कारवाई आणि सर्व बाधित शेतकऱ्यांना पीक विमा व मदत देण्याची मागणी केली आहे.