भिवंडीत डबल डेकर मेट्रो खासदार बाळ्या मामा यांचा रोख नेमका कोणावर?
शहापूर /साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
रांजनोली ते कल्याण डबलडेकर मेट्रो करण्यासाठी मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाचवेळा भेटलो. त्यानंतर त्यांनी डबलडेकर मेट्रोसाठी परवानगी दिली. परंतु कशेळी भागात ही मेट्रो डबलडेकर धावत नाही. त्यावेळच्या नेत्यांनी त्यासाठी प्रयत्नच केले नाही. अशी टीका भिवंडीचे खासदार बाळ्या मामा यांनी माजी केंद्रीय मंत्री कपील पाटील यांचे नाव न घेता केली.
भिवंडीत मेट्रो पाचचे निर्माण काम सुरु आहे. ठाण्यातील कापूरबावडी-भिवंडी आणि कल्याण अशी ही मेट्रो धावणार आहे. या मेट्रोसाठी भिवंडी आणि ठाणे शहराच्या वेशीवरील काल्हेर भागात देखील काम सुरु आहे. काल्हेर गाव भिवंडीतील सर्वात मोठे गाव आहे. येथे लोकवस्ती वाढत आहे. असे असतानाही या ठिकाणी मेट्रोचा थांबा नसल्याने खासदार बाळ्या मामा यांनी टीकास्त्र डागले.
बाळ्या मामा म्हणाले की, भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठे गाव काल्हेर आहे. येथे मेट्रो आली, कशेळीला थांबा मिळाला. तुम्ही आमचे नेते आहात, तुम्ही मंत्री होतात, तुमच्या कार्य-काळात काल्हेर सारख्या ठिकाणी, जिथे बाळासाहेबांचा पदस्पर्ष झाला. या गावाला एक इतिहास आहे. पण काल्हेर भागात मेट्रोचा थांबा का झाला नाही असे अंधभक्तांनी विचारायला नको? असा सवाल बाळ्या मामा यांनी उपस्थित करत अप्रत्यक्षपणे कपील पाटील यांच्यावर टीका केली.
बाळ्या मामा यांनी दावा केला की, ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाच वेळा भेटले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मी पत्र दिले. रांजनोली नाका ते कल्याण मेट्रोचे काम सुरु आहे. ही मेट्रो डबल डेकर बनवा. सर्वात खाली मालवाहू वाहने धावतील, त्यावरील पूलावरून हलकी वाहने आणि सर्वात वरुन मेट्रो धावेल. मी स्वत: पाचवेळा यासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो. त्यानंतर त्यांनी प्रकल्पाला मान्यता दिली. नुसती नेतेगिरी करायची नाही. मी खासदार आहे, गटर, वाॅटर- मीटर हे माझे काम नाही. माझे काम त्या पदानुसार असले पाहिजे. त्यावेळच्या प्रयत्न केले असते, तर कशेळी भागातही मेट्रो डबल डेकर झाली असती. दूरदृष्टी नसेल आणि नुसत्या विकासाच्या गप्पा मारणे असे चालत नाही असा टोला देखील त्यांनी लगावला.