मुंबई नाशिक महामार्गावर अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
नाशिक महामार्गावर दुचाकीने निघालेल्या दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी घडल्याचे उघडकीस आले. दीप भेरे आणि हर्षल कांबळे अशी मृतांची नावे आहेत. या अपघात प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चेरपोली आणि साखरोली परिसरात शोककळा पसरली आहे.
मुंबई नाशिक महामार्ग या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढू लागले आहे. नुकत्याच झालेल्या अपघातात दोन मित्रांना जीव गमवावा लागला आहे. या दोन मित्रांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांना आळा कसा बसले असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दीप भेरे (१८) हा शहापुर जवळील चेरपोली येथे तर, हर्षल कांबळे (१९) हा साखरोली येथे राहत होता. हे दोघे बुधवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान काही कामानिमित्त दुचाकीवरून नाशिकच्या दिशेने जात होते. मुंबई – नाशिक महामार्गावरील आटगाव येथील गुरुनानक ढाब्यासमोर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून वेगात येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत शहापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात वाहनाचा शोध सुरू आहे.