गुणवंतांच्या दारी शिक्षकांचा सन्मानाचा शिरकाव!
,यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याची तालुक्यात अभिनव परंपरा
“गुणवंतांच्या दारी शिक्षकांचा सन्मानाचा शिरकाव!”
यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभिनंदन करण्याची तालुक्यात अभिनव परंपरा
अमळनेर प्रतिनिधी :
माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल जाहीर होताच तालुकाभर आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत आपल्या कुटुंबासह शाळेचाही गौरव वाढविला आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यासाठी आता तालुक्यात एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम वेगाने लोकप्रिय होताना दिसत आहे.
“गुणवंतांच्या दारी शिक्षक” या संकल्पनेतून अनेक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व संस्थाचालक थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करत आहेत. विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन, पालकांशी संवाद आणि पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन अशा माध्यमातून हा उपक्रम अधिक भावनिक आणि संस्मरणीय ठरत आहे.
पूर्वी केवळ काही मोजक्याच शाळा अशा प्रकारचा उपक्रम राबवत होत्या; मात्र यंदा निकालाची गुणवत्ता उंचावल्याने अनेक शाळांनी हा उपक्रम उत्साहाने स्वीकारला आहे. विशेष म्हणजे कॉपीमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश शिक्षकांसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केल्याने शिक्षक स्वतः त्यांच्या घरी पोहोचून कौतुक करत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून शिक्षणाविषयी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. “विद्यार्थ्यांचे यश म्हणजे शाळेचा खरा गौरव” ही भावना या उपक्रमातून अधोरेखित होत आहे.
या उपक्रमामुळे पालक आणि शाळा यांच्यातील नाते अधिक घट्ट होत असल्याचे चित्र दिसत आहे. “शिक्षक स्वतः घरी येऊन मुलाचे अभिनंदन करतात, यापेक्षा मोठा सन्मान कोणता?” अशा भावना पालक व्यक्त करत आहेत.
━━━━━━━━━━━━━━━
चौकट : बदलत्या शिक्षण संस्कृतीचा सकारात्मक चेहरा
सामान्यतः विद्यार्थी शाळेत येतात; मात्र यशाच्या क्षणी शिक्षकच विद्यार्थ्यांच्या दारी पोहोचत असल्याने शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडताना दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या यशात सहभागी होणारी ही शिक्षकांची संवेदनशील भूमिका समाजातही प्रेरणादायी ठरत आहे.
— डी. ए. धनगर
उपक्रमशील शिक्षक व ट्रेनर
साने गुरुजी विद्यालय, अमळनेर