महापालिकेच्या मेगाभरतीचा मांर्ग अखेर मोकळा !
जळगाव :
गेल्या १४ वर्षापासून रखडलेली 'बिंदू नामावली' विभागीय आयुक्त कार्यालयाकडून मंजूर झाली आहे. यामुळे महापालिकेतील
नोकरभरतीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. या मंजुरीमुळे आता आरक्षित जागा, पदोन्नती आणि थेट भरती प्रक्रियेला गती मिळणार आहे. शासकीय नियमांनुसार दर तीन वर्षांनी बिंदू नामावली अद्ययावत
करणे बंधनकारक असते. मात्र, महापालिकेची बिंदू नामावली शेवटची २०११-१२ मध्ये झाली होती. आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी मंत्रालयापासून ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत सातत्याने केलेल्या प्रभावी पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
सध्या ६ लाख लोकसंख्या असलेल्या जळगाव शहराचा डोलारा अवघ्या १,४५० कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. महापालिकेसाठी एकूण २,१५७ इतके मनुष्यबळ मंजूर असले, तरी प्रत्यक्षात ७५० पेक्षा जास्त जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वाधिक कमतरता वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचाऱ्यांची
आहे. वर्ग ३ ची तब्बल ५०१ पदे आणि वर्ग ४ ची १४६ पदे रिक्त असल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ही संख्या आणखी वाढत चालली आहे, ज्याचा थेट फटका मनपाच्या दैनंदिन कामकाजासह करवसुलीवरही होत आहे.