गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून जनता प्रवास करतील आव्हाड यांची पंतप्रधानांवर खरवरीत टीका
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसांत ३० ते ४० रुपयांनी वाढणार आहेत. जय मोदी म्हणत गाय, म्हशी, घोडी यांचा व्यापार मुबलक करणार आहेत. लोक आता गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे असा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पंतप्रधान नरेंद् मोदी यांच्यावर केला.
ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे गटनेते अभिजीत पवार यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन ठाण्यात झाले. या कार्यक्रमाला आमदार शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अश्रफ उर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान तसेच पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पश्चिम आशियातील संकटाची परिस्थिती पाहता पेट्रोलियम उत्पादनांचा जपून वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. या आवाहनानंतर आता विरोधी पक्षांकडून पंतप्रधानांवर टीका केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात पेट्रोल-डिझेलचा भरपूर साठा असल्याचे सांगत होते. परंतु अचानक काय झाले? अर्थव्यवस्था ढासळत असून यामध्ये आपला गळा दाबला जाणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसांत ३० ते ४० रुपयांनी वाढणार आहेत. जय मोदी म्हणत गाय, म्हशी, घोडी यांचा व्यापार मुबलक करणार आहेत.लोक गाय, म्हशी, घोडी, गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत होते याचे उत्तम उदाहरण असल्याचे आव्हाड म्हणाले. देशातील आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट होत चालली असून आगामी काळात महागाईने उच्चांक गाठण्याची शक्यता असल्याचा इशाराही आव्हाड यांनी दिला. सामान्य नागरिकांवर आर्थिक संकटाचे मोठे ओझे पडणार आहे. विविध जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढणार असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होईल असे ते म्हणाले.