रिक्षा चालकांच्या न्यायहक्कासाठी बालाजी आडे यांचे आमरण उपोषण; सरकारसमोर १० मागण्यांचे मोठे आव्हान.
छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र श्रमिक विकास वाहतूक संघटनेच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर येथे रिक्षा चालकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघटनेचे संस्थापक सचिव बालाजी आडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दिनांक ४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
संघटनेने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून रिक्षा चालकांच्या १० प्रमुख मागण्या तातडीने निकाली काढण्याची मागणी केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने दिलेल्या पत्रात ऑटो रिक्षा एलपीजी गॅस पंप हे खाजगी कंपन्यांचे असल्याने शासनाचे दर लागू होत नाहीत, असे स्पष्ट केले. मात्र हे उत्तर रिक्षा चालकांसाठी अत्यंत निराशाजनक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
संघटनेच्या मते, खासगी कंपन्यांच्या मनमानीमुळे एलपीजी गॅसचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून सर्वसामान्य रिक्षा चालकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने हस्तक्षेप करून गॅसचे दर पूर्ववत करावेत, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय अवैध वाहतूक सेवा बंद करणे, धर्मवीर आनंद दिघे मीटर टॅक्सी कल्याणकारी योजनेचा लाभ परवानाधारक चालकांना देणे, विनापरवाना रिक्षांवर कारवाई, अधिकृत पिकअप-ड्रॉप पॉइंट निश्चित करणे, अवाजवी दंड रद्द करणे, पिंक रिक्षांचा गैरवापर रोखणे, बाहेरील जिल्ह्यातील रिक्षांच्या व्यवसायावर नियंत्रण आणणे तसेच शहरातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवा बंद करण्याच्या मागण्याही करण्यात आल्या आहेत.
संघटनेने जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, आरटीओ आणि संघटना प्रतिनिधी यांची तातडीने संयुक्त बैठक घेऊन लेखी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने परिस्थिती चिघळण्यापूर्वी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.