मुंबई| 'मिसिंग लिंक'ला 'वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर' नाव देण्याची मागणी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा वेळ वाचवणाऱ्या आणि अभियांत्रिकीचा चमत्कार मानल्या जाणाऱ्या 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सह्याद्रीच्या कडेकपारीत रस्ता शोधण्यासाठी ऐतिहासिक योगदान देणारे आणि देशासाठी प्राणांची आहुती देणारे 'वीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर' यांचे नाव या मार्गाला देण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.कोण होते शिंग्रोबा धनगर? (ऐतिहासिक संदर्भ)१८ व्या शतकाच्या मध्यावर, जेव्हा ब्रिटिशांना मुंबई ते पुणे हा मार्ग जोडण्यासाठी सह्याद्रीच्या दुर्गम बोरघाटात रस्ता किंवा रेल्वे मार्ग सापडत नव्हता, तेव्हा खंडाळा घाटातील भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती असलेल्या शिंग्रोबा धनगर यांनी ब्रिटिशांना मार्ग दाखवला होता.इतिहासातील नोंदीनुसार, ब्रिटिशांनी जेव्हा शिंग्रोबांना या कार्याबद्दल 'बक्षीस' मागण्यास सांगितले, तेव्हा या स्वाभिमानी सुपुत्राने सोने-नाणे न मागता "माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या" अशी मागणी केली. शिंग्रोबांच्या या प्रखर राष्ट्रप्रेमामुळे संतप्त झालेल्या ब्रिटिश अधिकार्यांनी त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. आजही खंडाळा घाटात शिंग्रोबांचे मंदिर असून, दररोज हजारो प्रवासी तिथे नतमस्तक होतात. लोणावळा ते खालापूर दरम्यानचा हा मार्ग जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे. यामुळे खंडाळा घाटातील वळणदार रस्ता आणि वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे. "सह्याद्रीचा हा रस्ता शिंग्रोबांच्या रक्ताने न्हालेला आहे. त्यांच्या बलिदानाची आठवण म्हणून या नवीन लिंकला त्यांचेच नाव देणे हा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक न्याय ठरेल." स्थानिक संघटना प्रतिनिधी