मुंबईत अख्ख्या कुटुंबाचा मृत्यू, नळबाजारात भीतीमुळे कोणी कलिंगड विकत घेईना
मुंबईच्या पायधुनी परिसरात सोमवारी कलिंगड खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन एका कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेनंतर या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर नळबाजार फ्रुट मार्केट आणि आजुबाजूच्या परिसरात कोणीही फळविक्रेत्यांकडून कलिंगड (Watermelon) घ्यायला तयार नाही. या प्रकरणात कलिंगड खाल्ल्याने त्यातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने पोलिसांकडून (Mumbai Police) पायधुनीतील नळबाजार (Nal Bazar) येथील फळ विक्रेत्यांची चौकशी सुरु करण्यात आली आहे. घडलेली घटना इतकी गंभीर होती की, या घटनेनंतर बाजारात कलिंगडाची विक्रीच फळ विक्रेत्यांना बंद केली आहेत
सध्या पोलिसांकडून या घटनेचे सगळे पैलू तपासून पाहिले जात आहेत. पण अद्याप पोलिसांना कोणतीही संशयास्पद बाब आढळून आलेली नाही. कलिंगड आणि फळविक्रेत्यांच्या चौकशीतूनही अद्याप पोलिसांना कोणतीही कामाची माहिती हाती लागलेली नाही. पायधुनीच्या ज्या घाटी मोहल्ला परिसरात हा प्रकार घडला तेथील सर्व फळविक्रेत्यांची पोलिसांनी चौकशी केली. मात्र, या परिसरात इतरत्र कुठेही विषबाधा झाल्याची घटना आढळून आलेली नाही. त्यामुळे पोलिसांना या प्रकरणात वेगळ्याच गोष्टीमुळे या कुटुंबाला विषबाधा झाली असावी, असा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. पोलिसांनी मृतांचा व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी पाठवला आहे. मृतांचा शवविच्छेदन अहवाल येणे बाकी असून हिस्टोपॅथॉलॉजी अहवालातून मृत्यचे नेमके कारण स्पष्ट होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. मात्र, तोपर्यंत पोलिसांकडून याप्रकरणात शक्य त्या सर्व बाजूंना तपास केला जात आहे.
पायधुनीच्या घाटी मोहल्ल्यातील मोगल उमरेट्टी इमारतीमध्ये ही घटना घडली. मृत्यू झालेले डोकाडिया कुटुंब याच इमारतीमध्ये राहत होते. अब्दुल्ला डोकाडिया (40), नसरीन डोकाडिया (35) आणि त्यांच्या मुली आयशा (16) व झैनब (13) अशी मृतांची नावे आहेत.