ठाणे जिल्ह्यातील तापमान 38 अंश सेल्सिअस वर वातावरणात आद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाही लाही
शहापूर साजिद शेख
ठाणे जिल्हा प्रतिनिधी
राज्यात गेले काही दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली असून यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील काही जिल्ह्यातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अनेक ठिकाणी उष्मघाताची रुग्ण आढळून आली आहेत. ठाणे जिल्ह्यातही तापमान ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. वातावरणातील आद्रतेचे प्रमाण अधिक असल्यामुळे नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. ठाणे जिल्ह्यात अद्याप उष्मघाताचा एकही रुग्ण आढळून आलेला नसून नागरिकांनी योग्यती काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील तापमानात गेले काही दिवसांपासून वाढ होऊ लागली आहे. आठवड्याभरापूर्वी ठाणे जिल्ह्याचे तापमान ३६ अंश सेल्सिअस होते. परंतू, या आठवड्यात ३८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. सकाळी १०
नंतर तापमानाचा पारा वाढत असल्याने घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. दुचाकी चालक, रस्त्यालगत काम करणारे मजूर, फेरीवाले, पादचारी यांना उन्हाचा सर्वाधिक फटका बसत आहे. तर, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला वर्ग यांना सकाळी १० नंतर घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अति उष्णतेमुळे रिक्षा चालक देखील दुपारच्या वेळेस रिक्षा बंद ठेवत असल्यामुळे दुपारच्या वेळी रिक्षांचा तुटवडा भासत असून नागरिकांना दुपारच्या वेळी रिक्षा मिळण्यासाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. येत्या काही दिवसात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.वाढत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होऊ लागला आहे. डोके दुखी, थकवा येणे असे आजार नागरिकांना होऊ लागले आहेत. तसेच उष्णतेमुळे थंड पेयाचे अति सेवन केले जात असल्याने सर्दी खोकला तसेच घशाचे संसर्ग देखील नागरिकांमध्ये विशेष करुन लहान मुलांमध्ये होत असल्याची माहिती स्थानिक डॉक्टरांनी दिली.
उष्मघाताची लक्षणे…
– शरीरातील तापमान वाढणे आणि अंगाची आग होणे – तीव्र डोकेदुखी – चक्कर येणे
– उलटी किंवा मळमळ – श्वास घेण्यास त्रास होणे – तोंड कोरडे पडणे
– उष्मघाताचा त्रास होऊ नये यासाठी काळजी कशी घ्यावी ?
वाढत्या तापमानामुळे उष्मघाताचा त्रास होऊ नये यासाठी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. घरा बाहेर पडताना डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर स्कार्फ बांधावा, पाण्याची बॉटल सोबत ठेवावी, पायी चालताना जास्तीत जास्त सावली असलेल्या ठिकाणाहून चालण्यास प्राधान्य द्यावे. सतत पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा तसेच गरज असल्यास वैद्यकीय मदत घ्यावी.वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परंतू, यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी ऐन दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळले पाहिजे आणि योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यात अद्याप तरी
उष्मघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही. परंतू, असे रुग्ण आढळल्यास उपचारात त्यांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे.