निसर्गाचे संवर्धन प्रामाणिकपणे करण्याची गरज-अरविंद जगताप
नाशिक:- 'राघवण' कादंबरीच्या निमित्ताने मराठी भाषेत प्रदूषणासारखा भयावह विषय प्रा.जगदीश देवरे यांनी मांडला, हे कौतुकास्पद आहे. विकासाच्या नावाखाली आपण जग उद्ध्वस्त केलं आहे. म्हणूनच निसर्गाचे आपण प्रामाणिकपणे संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादन सह्याद्री देवराई फाउंडेशनचे उपाध्यक्ष, लेखक, दिग्दर्शक आणि गीतकार अरविंद जगताप यांनी केले.
कुसुमाग्रज स्मारकाच्या विशाखा सभागृहात कादंबरीकार प्रा.जगदीश देवरे यांच्या नवी दिल्ली येथील कौटिल्य प्रकाशन प्रकाशित 'राघवण' या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ.नंदकुमार राऊत, ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक प्राचार्य डॉ.किशोर पवार, सेवानिवृत्त उपविभागीय वनाधिकारी अजित चव्हाणके, मुक्त विद्यापीठाच्या सेवानिवृत्त संचालिका डॉ.कविता साळुंके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय कंत्राटदार राजेंद्र देसले, लेखक प्रा.जगदीश देवरे आणि शीतल देवरे मंचावर उपस्थित होते.
श्री.जगताप पुढे म्हणाले की, माणूस निसर्गापासून जितका दूर जाईल, तितका त्रास त्याला होईल. विज्ञानाचा सदुपयोग करून विनाश टाळला पाहिजे. माणुसकी आणि परोपकार ही मूल्यं निसर्गच आपल्याला शिकवतो, असेही ते म्हणाले.
डॉ.नंदकुमार राऊत, डॉ.किशोर पवार, अजित चव्हाणके, प्रा.डॉ.कविता साळुंके, राजेंद्र देसले यांच्यासह लेखक प्रा.जगदीश देवरे यांनी आपल्या मनोगतात प्रदूषणासारखा भीषण विषय मांडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश कादंबरीत दिला असल्याचे सांगितले. विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सागर साळुंके यांनी आभार मानले तर रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले. पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप झाला.