परिवहन मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात तक्रारींचा भडका; कल्याण आगारात बेशिस्तीचे आरोप
परिवहन मंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात तक्रारींचा भडका; कल्याण आगारात बेशिस्तीचे आरोप
प्रतिनिधी/ तानाजी किर्दत
ठाणे : परिवहन मंत्र्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील कल्याण आगारातच कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा भडका उडाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. येथील चालक तथा वाहक श्री. रामदास सदाकाळ यांच्या बेशिस्त वर्तनाविरोधात कर्मचाऱ्यांनी थेट राज्याच्या परिवहन मंत्र्याकडे गंभीर तक्रार दाखल केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित कर्मचाऱ्याकडून सहकाऱ्यांशी अयोग्य वर्तन, शिवीगाळ, मारहाण तसेच मानसिक व शारीरिक छळ केल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या प्रकारामुळे आगारातील कामकाजावर विपरीत परिणाम होत असून, कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे, हा संपूर्ण प्रकार परिवहन मंत्र्यांच्या प्रभावक्षेत्रात घडत असल्याने या प्रकरणाला अधिक संवेदनशीलतेने पाहिले जात आहे. संबंधित कर्मचाऱ्याविरोधात यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
काही घटनांमध्ये वाद इतका वाढला की प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याची माहितीही समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून संबंधितावर बदलीसह कठोर कारवाई करावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे.
दरम्यान, कामाच्या ठिकाणी सुरक्षित, शांत आणि सुसंवादाचे वातावरण निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.