राजेवाडी (ए.जी.) अंधारात; संध्याकाळी 7 ते 10 लोडशेडिंगविरोधात नागरिक संतप्त – आंदोलनाचा इशारा....
जामखेड (अहिल्यानगर): तालुक्यातील राजेवाडी (ए.जी.) येथे दररोज संध्याकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत जाणीवपूर्वक लोडशेडिंग केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
सदर वेळ ही नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची असताना वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम, तसेच लहान मुले, वृद्ध व रुग्णांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. अंधारामुळे परिसरात सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असून, पाणीपुरवठ्यासह इतर जीवनावश्यक सुविधा ठप्प होत आहेत.
विशेष म्हणजे, याबाबत संबंधित वीज वितरण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वीज ही अत्यावश्यक सेवा असून, अशा पद्धतीने संध्याकाळच्या महत्त्वाच्या वेळेत लोडशेडिंग करणे हे नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे उघड उल्लंघन असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
👉 नागरिकांची ठाम मागणी:
संध्याकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतचे लोडशेडिंग तात्काळ बंद करावे
किमान सिंगल फेज वीजपुरवठा अखंड सुरू ठेवावा
दरम्यान, मानवाधिकार व सामाजिक कार्यकर्ता रवीकुमार प्रदीप शिंदे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, 48 तासांच्या आत समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच प्रकरण राज्यस्तरावर नेण्यात येईल.