कर्मचाऱ्यांचा 15% पगार कापणार, तेलंगणा सरकार !
Aima news.
जर एखादा कर्मचारी आपल्या आई वडिलांची देखभाल करत नसेल तर त्याच्या पगारातून पैसे कापून ते आई वडिलांना देण्यात येणार आहेत. तेलंगणा सरकारने याबाबतचा एक कायदा मंजूर केला आहे. आई वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चाप बसवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. या कायद्यातंर्गत कर्मचाऱ्याच्या पगारातून १५ टक्के अथवा १० हजारापर्यंत कपात होऊ शकते. हा नियम सरकारी तसेच खासगी कर्मचाऱ्यांना लागू असेल. आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनाही कायद्याच्या कक्षेत घेण्यात आले आहे.
सध्या वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीत बऱ्याचदा आई वडिलांचा सांभाळ न करता त्यांना वाऱ्यावर सोडून दिले जाते. ही सामाजिक परिस्थिती लक्षात घेता तेलंगणा सरकारने हा नवीन कायदा आणला आहे. या कायद्यातंर्गत आई वडील थेट मुलाविरोधात तक्रार करू शकतात.
त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज करावा लागेल आणि त्यांच्या परिस्थितीशी, उत्पन्नाची माहिती द्यावी लागेल. जिल्हाधिकारी ६० दिवसांच्या आत या तक्रारीवर निर्णय घेतील. सुनावणीनंतर आदेश जारी करण्यात येईल.