भोकरदन तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात सोमवार दिनांक .30/03/2026 रोजी दुपारच्या सुमारास अचानक अवकाळी वादळी वारा, मुसळधार पाऊस व गारपिटीचा तडाखा बसला. या नैसर्गिक आपत्तीमुळे पिंपळगाव रेणुकाई, शेलुद, वडोद तागंडा, पोखरी, धावडा, विजोरा, वालसावंगी, पारध, कोळी कोठा, जळगाव सपकाळ, अंन्वा व शिवना या गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सध्या रब्बी हंगामातील गहू व हरभरा काढणीस तयार असताना आलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. गारपिटीमुळे पिके जमिनीवर आडवी पडली असून अनेक ठिकाणी दाण्यांचे नुकसान झाले आहे. तसेच कांद्याच्या पिकालाही मोठा फटका बसला असून शेतात पाणी साचल्याने कांदा सडण्याची भीती निर्माण झाली आहे.
अचानक आलेल्या या आपत्तीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.