सीईओ आनंद भंडारी साहेब, कृपया तात्काळ चौकशी करा!
अहिल्यानगर, दि. 29 मार्च 2026:
अहिल्यानगर जिल्हा परिषदेमध्ये सध्या टेंडर प्रक्रियेत गंभीर अनियमितता होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. विशेषतः दक्षिण विभागात कार्यरत असलेला ‘टेंडर क्लार्क’ रासकर याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
माहितीनुसार, रासकर याला प्रमोशन मिळाल्यानंतरही त्याच पदावर दक्षिण विभागात नियुक्त करण्यात आल्याची बाब संशयास्पद मानली जात आहे. वरिष्ठ पदे रिक्त असतानाही अशी नियुक्ती का करण्यात आली, यावर प्रश्न उपस्थित होत आहेत.
याहून गंभीर बाब म्हणजे, विविध विकासकामांसाठी येणाऱ्या निविदांपैकी कमी दराच्या निविदांऐवजी जादा दराच्या (Above) निविदांना प्राधान्य दिले जात असल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे १०० निविदांपैकी तब्बल ८०% निविदा जादा दराच्या मंजूर करण्यात आल्याचा आरोप होत आहे.
या प्रक्रियेमुळे शासनाच्या निधीचा अपव्यय होत असून जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. तसेच, जादा दराने मंजूर झालेल्या कामांच्या गुणवत्तेबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.
दरम्यान, कार्यकारी अभियंता सागर चौधरी यांच्या मर्जीनेच संबंधित कर्मचाऱ्याची बदली व नियुक्ती झाल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगली आहे.
सध्या जिल्हा परिषदेत ‘प्रशासक राज’ असल्याने लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्यामुळे अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
👉 या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणावे, अशी जोरदार मागणी नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.