अमरावतीत आदिवासी विद्यार्थ्यांवर आर्थिक संकट; थकीत अनुदानावर युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा
अमरावती | प्रतिनिधी
पंडित दीनदयाल उपाध्याय (स्वयंम) योजना व स्वाधार योजना अंतर्गत मिळणारे अनुदान थकीत राहिल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक गरजू आदिवासी विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे. निवास व भोजनाचा प्रश्न गंभीर बनल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्हा युवक काँग्रेस यांनी आक्रमक भूमिका घेत शासनाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांना वेळेवर आर्थिक मदत न मिळाल्यामुळे त्यांचे शिक्षण धोक्यात येत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक विद्यार्थ्यांना वसतिगृह भाडे आणि अन्नासाठी पैसे नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शासनाने तातडीने अनुदान वितरित करावे, अन्यथा मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या संदर्भात समाज कल्याण विभाग व आदिवासी विकास विभाग यांना निवेदन देण्यात येणार असून, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, शासनाने तात्काळ दखल घेऊन थकीत अनुदान वितरित करण्याची मागणी जोर धरत आहे.