logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सम्राट अशोक भारताचा तिसरा मौर्य सम्राट

सम्राट अशोक
भारताचा तिसरा मौर्य सम्राट


भारतीय सम्राट आणि मौर्य घराण्यातील तिसरे शासक होते. अशोक हे भारतवर्षात सर्वात पहिले चक्रवर्ती सम्राट होते, त्यांच्या अगोदर बिंदुसार आणि चंद्रगुप्त हे सम्राट मानले जातात, परंतु त्यांना चक्रवर्ती म्हटले जात नाही. अशोक यांनी प्राचीन भारतावर इ.स.पू. २७२ - इ.स.पू. २३२ दरम्यान राज्य केले. त्यांना चक्रवर्ती सम्राट अशोक, महान अशोक आणि अशोक द ग्रेट नावांनीही ओळखले जाते. अशोक हे भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा लोककल्याणकारी राजा ज्यांनी अखंड भारताचा बहुतांश भाग काबीज केला होता. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे अफगाणिस्तान व थोडा इराण, पूर्वेकडे आसाम तर दक्षिणेकडे म्हैसूरपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला.

सम्राट अशोक मौर्य
धम्माराखित, धर्माराजिका, धम्माराजिका, धम्मारज्ञ, चक्रवर्तीं, सम्राट, राज्ञश्रेष्ठ, मगधराज, देवानाम प्रिय:, प्रियदर्शी, भूपतिं, मौर्यराजा, धर्माशोक, धम्मशोक, असोक्वाध्हन, अशोकवर्धन, प्रजापिता, धम्मनायक, अशोक महान

आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शिलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख सन १८३७ मध्ये वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे शिलालेख हे ब्राह्ममी,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे ब्राम्ही लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्ध धर्म, बौद्ध धर्माची तत्त्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. सम्राट अशोक हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

अशोकानंतर राज्याला योग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे मौर्य साम्राज्याचा ऱ्हास घडून आला विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे अशोकाने बौद्ध धर्माची शिकवण देताना लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीला चालना दिली शांततेच्या मार्गाने कुठलेही राज्य जास्त काळ टिकू शकेल यावर त्याचा विश्वास निर्माण झाला बौद्ध धर्माच्या प्रसाराला त्याने चालना दिले त्यासाठी शासकीय अधिकारी नेमले स्वतःच्या मुलांना त्याने धर्म प्रसारासाठी पाठवले धम्मचक्र परिवर्तन करणारा अशोक हा प्राचीन भारतातील एक श्रेष्ठ व चक्रवर्ती शासक ठरला आहे इतिहासाला युगानुयुगे त्याची नोंद घ्यावी लागेल मानवी कल्याणासाठी पथक प्रयत्न करणारा प्रजा हीच दक्ष व प्रजा कल्याणकारी शासक म्हणून अनेक इतिहासकारांनी अशोकाच्या कार्याचा गौरव केलेला आहे

माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ मध्ये म्हणतात की, ‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, अलेक्झांडर द ग्रेट, ऑगस्टस सीझर, चेंगीजखान, तैमूर, रशियाचा पहिला पीटर किंवा पहिला नेपोलियन यांच्याशी केली जाऊ शकते; पण अलेक्झांडरसारखा सम्राट् अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला नेपोलियन जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, तैमूर आणि रशियाच्या पहिल्या पीटरने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वतःच्या प्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला गौतम बुद्धांच्या किंवा येशू ख्रिस्ताच्या पंक्तीत नेऊन बसवले होते.’’

बालपण व सुरुवातीची कारकीर्द
संपादन
अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता. बिंदुसार यांना अनेक पत्‍नी होत्या, त्यातील धर्मा ही अशोकची आई होती. अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता. त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती. परंतु अशोकची सेनानी बनण्याची क्षमता वादातीत होती. त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुःस्वास वाढला होता. चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्य सुखाचा त्याग केला, त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली. ही तलवार शोधून अशोकाने आपल्याजवळच ठेवली. अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होता. तसेच चांगला शिकारीही होता. त्याला तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते. त्याच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसाराने तरुणपणी त्याला अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते, हे काम त्याने सहज पार पाडले. अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असे आले आहे आणि ती एका राज्याची मुलगी होती असा उल्लेख काही लेखक करतात. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये एक महान चक्रवती सम्राट म्हणून अशोकाला मान्यता मिळालेले आहे तत्कालीन अशोकाचे शिलालेख वस्तू हे याची साक्ष देणारे महत्त्वपूर्ण साधने आहेत.

राज्यारोहण

अशोक जसजसा सेनानी म्हणून परिपक्व होत गेला तसतसे त्याच्या भावांचा त्यावरील दुस्वासही वाढत गेला. अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्याच्या एका मागोमागच्या मोहिमांमुळे त्याची राज्यभर कीर्ती दुमदुमत लागली. त्यामुळे त्याच्या भावांना असे वाटले की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील. बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकचा दुस्वास करण्यात आघाडीवर होता. सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे, तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले. अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकची कीर्ती अजून वाढत गेली. (त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला.)

अशोकच्या यशाने त्याच्या भावांचा दुस्वास अजून वाढला, घरातील वाढत्या अशांततेमुळे व सुसीमने बिंदुसारला अशोकाविरुद्ध भडकावले, या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला, तो त्याने पाळला. या काळात अशोकने कलिंगमध्ये जाउन वास्तव्य केले. या काळात त्याची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली. ती नंतर अशोकची दुसरी अथवा तिसरी पत्‍नी बनली. अशोकच्या काही कोरीवकामांवर तिचे उल्लेख आहेत.

मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला, बिंदुसारने अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले. अशोक उज्जैनला गेला व एका लढाईत घायाळ झाला. त्या काळात असे मानतात की सुसीमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले, जे परतावून लावण्यात आले. अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्धधर्मी परिचारकांची नेमणूक करण्यात आली होती. यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोकचा विवाह झाला. देवी ही विदिशा येथील एका व्यापा‍ऱ्याची मुलगी होती. ती बौद्धधर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही. त्याने अशोकला पाटलीपुत्रमध्ये रहाण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले.

अशोकची पुढील काही वर्षे शांततामय गेली. बिंदुसारचे इसवी सनपूर्व २७३ मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाला. या प्रयत्‍नांत देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, त्यात अशोकची आई मारली गेली. या घटनेने संतप्त झालेल्या अशोकाने पाटलीपुत्रवर आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्रचा पाडाव केला. आपल्या सर्व बंधूंची हत्या केली. यानंतर अशोकाची महत्त्वाकांक्षा वाढीस लागली. मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्याने अनेक प्रांत एकामागोमाग पार करण्याचा सपाटा लावला. या काळात अशोकला चंड-अशोक म्हणू लागले व एक क्रूरकर्मा अशी त्याची ओळख तयार होऊ लागली.

राज्यरोहण झाल्यानंतर आठ वर्षांच्या काळात अशोकने अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रम्हदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान-इराणच्या सीमेपर्यंत, उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळ पर्यंत वाढवला. जवळपास सर्व भारत त्याने एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली. संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणार चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकाच्या नावाचा उल्लेख करावा लागतो रोमिला थापर यांनी अशोकाच्या कार्याचा विशेष गौरव केलेला आहे.

कलिंगचे युद्ध
संपादन
मुख्य लेख: कलिंगचे युद्ध
कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे. अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाला होता. सर्वत्र त्याची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती. भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते. प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिशा तसेच छत्तीसगढ व झारखंड मधील काही भाग येतात.

कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत. सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात. त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते. मौर्यांच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते. तसेच बाह्य जगाशी व्यवसायवृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावर सत्ता हवी होती, ती कलिंगाकडे होती. तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकाने युद्ध केले असावे. कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती. युद्ध साधारणपणे इस पूर्व २६५ च्या सुमारास सुरू झाले. सुशीमच्या एक भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती. अशोकने हे कारण मानले व कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले.

सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली. या पराभवाने अजून अशोकाने चवताळून जाउन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावर आक्रमण केले. कलिंगाच्या सैन्याने मोठ्या धैर्याने युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावपेचापुढे काही चालले नाही. अशोकाने पुढे सैन्याला संपूर्ण कलिंगमध्ये दहशत माजवली. मोठ्या प्रमाणावर लोकांचे शिरकाण करण्यात आले. या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदींनुसार साधारणपणे १ लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते. मोठ्या प्रमाणावर नागरिकांना हद्दपार करण्यात आले. कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण घटना मानली जाते कलिंग युद्धानंतर त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला एक नवा विचार स्वीकारून ठाणे आपली राज्यव्यवस्था अधिक सक्षम आणि दृढ केली त्याच्या शांततेच्या मार्गाचा सकारात्मक परिणाम राज्य व्यवस्थेवर झाला

बौद्ध धर्माचा स्वीकार व प्रसार

अशोकाने कलिंगचे युद्ध पार पडल्यानंतर जिकलेल्या रणांगणाची व शहरांची पहाणी करायची ठरवली, व त्यावेळेस त्याने फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीग, सडण्याचा दुर्गंध, जळलेली शेती, घरे व मालमत्ता पाहिली. ते पाहून अशोकाचे मन उदास झाले व यासाठीच का मी हे युद्ध जिंकले, व हा विजय नाही तर पराजय आहे, असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनाशाचे कारण मानले. हा पराक्रम आहे की दंगल, व बायका मुले व इतर अबलांचा हत्या कशासाठी व यात कसला प्रराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले. एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचे अस्तित्वच हिरावून घ्यायचे? ह्या विनाशकारी युद्धानंतर शांती, अहिंसा, प्रेम, दया ही मूलभूत तत्त्वे असलेला बौद्ध धर्मीयांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले. त्याने स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले. यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटांपेक्षा वेगळे ठरवतात. ज्यात क्रूरकर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले. अशी कलिंगचे युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते. बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात. अशोकाने पाटलीपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले अग्नीय अशिया आणि मध्य आशिया येथील देशांमध्ये त्याने धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्याने अनेक स्तूप आणि विहार बांधले त्याचप्रमाणे अशोकाने अनेक सोई निर्माण करण्यावर भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशूंना मोफत औषध उपचार मिळावे याची त्यांनी सोय केली होती अनेक नवे रस्ते बांधले प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली नव्या धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या अशा प्रकारे त्याने अनेक लोक उपयोगी आणि कल्याणकारी कार्य केलं होतं त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचे कामही अशोकाने केले

१९७१ साली सम्राट अशोकाचा एक लघु शिलालेख मध्य प्रदेशातील पांगुरारीया (प्रत्यक्षात नक्तितालाई) या खेड्याजवळ सापडला. या शिलालेखातील मजकुराचे योग्य भाषांतर जर्मनीतील प्राध्यापक हॅरी फाल्क यांनी केल्यानंतर वरील समजुतीला छेद मिळाला असून सम्राट अशोक तरुणपणापासूनच बौद्ध विचारधारा मानणारा होता हे सिद्ध झाले आहे. राजकुमार अशोक उज्जैन प्रांताचा अधिकारी असताना आपल्या मैत्रिणीसोबत (नक्तितालाई) येथे सहलीला आला होता असे या शिलालेखात लिहिलले आढळले आहे. या ठिकाणी बौद्ध भिक्षु संघाचे वास्तव्य होते याचे अनेक पुरावे आजही येथे पहायला मिळतात.

अशोकाच्या ह्या कार्यात त्याला देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली. अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा ह्यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली. असे मानतात की अशोकाने बौद्धधर्मीयांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली. त्यांतील काही स्तूपांचे अवशेष आजही पहावयास मिळतात. यातील मध्यप्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे, हा स्तूप अशोकाने बांधला असे मानतात. अशोकाने आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले, जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवर बंदी आणली, प्राण्यांवर होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरही बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आले. शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णूपणे वागवले. गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच, शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जातिधर्माच्या लोकांना सहिष्णुरीत्या वागवले जाई. अशोकाने आपले एकेकाळी ज्याच्यांशी युद्धे केली त्यांच्याशीही मैत्रिपूर्ण संबध वाढवले. सम्राट अशोकाने अनेक समाजोपयोगी कार्ये केली.

अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालये व महामार्गाचे जाळे निर्माण केले, रस्त्यांच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे, असे मानतात. आपण सम्राट असल्याच्या अधिकाराचा फायदा त्याने समाजोपयोगी कार्यासाठी केला. त्यानंतर अशोकाला धम्मअशोक असे म्हणू लागले. अशोकाने धम्माची प्रमुख आचारतत्त्वे विशद केली, अहिंसा, सर्व जातिधर्मांबद्दल सहिष्णुता, वडिलधाऱ्या माणसांना मान देणे, संतांना, शिक्षकांना योग्य तो मान देणे, दासांना माणुसकीने वागवणे. अशा आचारतत्त्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही.

अशोकाच्या इतिहासकारांनुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांशी ग्रीक राज्ये, चोल साम्राज्य याच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती. परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याच्या शेजारी राज्यांनी त्याला छेडण्याचे साहस केले नाही. तसेच बौद्ध धर्म स्वीकारला, अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले. अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते. तसेच चंद्रगुप्त मौर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस, इजिप्तपर्यंत पोहोचली होती असे कळते.

अशोकाचे स्तंभ व शिलालेख

अशोकाने भारतीय इतिहासातील सर्वांत महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा दिला म्हणजे त्याने त्याच्या राज्यात सर्वत्र लिहिलेले शिलालेख. अशोकाअगोदरच्या व नंतरच्या भारतीय राजांच्या फारश्या नोंदी आढळत नाहीत त्यामुळे तत्कालीन ऐतिहासिक मिळवणे जिकरीचे होते. अशोकाने आपल्या राज्याच्या सीमेवर महत्त्वाच्या शहरांमध्ये शिलालेखांद्वारे आपले विचार प्रकट केले आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञांनुसार आजवर सापडलेल्या शिलालेखांपेक्षा अजून जास्त संख्येने अशोकाने शिलालेख बांधले असावेत व ते काळाच्या ओघात लुप्त झाले, अजूनही उत्खननांमध्ये स्तंभ व शिलालेख सापडण्याची शक्यता आहे. वर नमूद केल्याप्रमाणे अशोका संदर्भात बरीचशी माहिती शिलालेखांवरून व स्तंभांवरून आलेली आहे. अशोकाला मुख्यत्वे "देवानांपिय पियदसी" (पालीमध्ये) अथवा संस्कृतमध्ये प्रियदर्शी असा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ "देवांचा प्रिय व चांगले दाखविणारा" असा होतो. त्याच्या सर्व लेखांमध्ये त्याची महानता जाणवते, अशोकाने हे सर्व शिलालेख आपल्या साम्राज्यातील मार्गांवर मुख्य चौकांमध्ये स्‍थापित केले होते, जेणेकरून प्रजेला तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्याला अशोकाच्या राज्यातील आचारविचार कळावेत. अशोक आपल्या प्रजेला आपली मुले असेबसंबोधत असे व अहिंसेबद्द्ल व बौद्ध धर्माच्या तत्त्वांवर (धम्म व योग्य आचरणावर) त्याचा भर असे. अशोकाच्या लेखांमध्ये त्याच्या स्तुतीपर अनेक सुमने आहेत. ते अशोकाने मिळवलेल्या प्रदेशाची माहिती देतात. तसेच त्यांत शेजारच्या राज्याबद्दलची माहितीही आहे. एका स्तंभामध्ये कलिंग युद्धाचे वर्णन आहे त्यात अशोकाची साहाय्यक राज्ये व नागरी व्यवस्थापनेवरही माहिती कोरली आहे. सारनाथ येथील अशोक स्तंभ हा अशोकाचा सर्वांत प्रसिद्ध स्तंभ मानला जातो. हा वालुकाश्माचा बनला असून अशोकाने सारनाथला भेट दिल्याची त्यावर नोंद आहे. त्याच्या चारही बाजूने एकमेकांकडे पाठ केलेले सिंह आहेत. हा स्तंभ आता भारताचे राष्ट्रीय चिन्ह म्हणून वापरात आहे. इतिहासकारांसाठी व शास्त्रज्ञांसाठी अशोक कालीन चिन्हे, लेख, स्तंभांचा हा खूप महत्त्वपूर्ण ठेवा आहे. तो मौर्य साम्राज्याबद्दल अनेक गोष्टी उद्धृत करतो. अशोकाच्या चिन्हांवरून त्याला भावी पिढ्यांनी त्याच्याबद्दल काय विचार करावा, त्याला कोणत्या गुंणांसाठी त्याला लक्षात ठेवावे यामागची त्याची तळमळ लक्षात येते.

सैनिकी शक्ती
संपादन
अशोकांच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती होती. जरी कलिङ्ग युद्धात खूप सैनिक मारले गेले, तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण व्हावा एव्हढे प्रचंड सैनिकी सामर्थ्य सम्राट अशोकांचे होते.

सम्राट अशोकांचे सैन्यसामर्थ्य फार अफाट होते. जर या सम्राट अशोकांनी आपला साम्राज्य विस्तार करण्याचे ठरविले असते तर, या पृथ्वीतलावरील एकामागून एक देश जिंकून आपल्या अफाट साम्राज्यास जोडत गेले असते. सम्राट अशोकांचे गुप्तहेर खाते फार प्रभावी होते. त्यामध्ये महिला गुप्तहेरही होत्या.

सम्राट अशोकांनी कलिंगा युद्धाच्या रक्तपातानंतर जरी शांतिप्रिय असा बौद्ध धम्म स्वीकारला तरी त्यांनी आपले सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले होते. सम्राट अशोकांचे सैन्य खालीलप्रमाणे होते.

पायदळ (Military Men) : ६,००,००० (सहा लाख)
घोडेस्वार सैनिक (Horse Calvary) : ३०,००० (तीस हजार)
हत्तीदळ (Elephant Calvary) : ९,००० (नऊ हजार)
युद्ध नौका (Sea Boat) : २,००० (दोन हजार)
रथ सैनिक - २०,००० (वीस हजार)

सगळेच लोक जर अहिंसेने वागत असतील, तर त्या देशाचे संरक्षण कसे केले जाईल ? अशा काल्पनिक प्रश्नाचं उत्तर देणं खरं तर जरासं अवघडही आहे; पण ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात, एका सम्राटाने, ‘अहिंसा आणि अनुकंपा’ या तत्त्वांचा अवलंब करून भारतावर राज्य केले होते. त्यांचे नाव सम्राट अशोक – शांती आणि सामाजिक न्याय यांचा सम्राट. जुलूम–जबरदस्ती करून, स्वतःच्या ऐषारामासाठी सुख-समाधानासाठीच फक्त तजवीज करून किंवा स्वतःचा डामडौल मिरवत त्यांनी राज्य केले नाही तर स्वतःच्या ऐहिक सुखोपभोगांचा त्याग करत आणि स्वतःच्या प्रजेला समानतेने आणि न्यायाने वागवत त्यांनी राज्यकारभार पाहिला. आत्ताच्या जगात शांती, न्याय आणि एकोपा प्रस्थापित करण्यासाठी, आत्ताचे राज्यकर्ते, प्रशासक, राजकारणी लोक, मुलकी कर्मचारी, धार्मिक नेते आणि सर्वसामान्य लोक, या सर्वांनाच, सम्राट अशोकांचे हे आदर्श असे उदाहरण मार्गदर्शक ठरू शकेल.”
— दुली चंद्र जैन आणि सुनीता जैन (ग्रंथ- ‘अशोका एम्परर ऑर मॉन्क’)

“सम्राट अशोक हे शांततेसाठी वाहून घेतलेला महामानव होते आणि इतिहासात ते असे एकमेव सम्राट होऊन गेले, ज्यांनी कलिंगच्या लढाईत विजय मिळवल्यानंतर पुन्हा कुठलेच युद्ध न करण्याचा निर्धार केला होता. स्वतःचं उरलेलं पूर्ण आयुष्य फक्त आपल्या प्रजेच्याच नाही तर तमाम मानवजातीच्या सेवेसाठी वाहून घेतलं होतं. या सेवाव्रतात दिसलेला त्यांचा दानशूरपणा, उपकारबुद्धी, मनाचा मोठेपणा आणि दिलदार वृत्ती, संपूर्ण इतिहासात अगदी अभावानेच दिसून येते. भारतीय इतिहासात सम्राट अशोकांनी खरोखरच एक सवर्णकाळ निर्माण करून दाखवला.”
— डॉ. कीर्तीसिंघे

अशोक जयंती
संपादन
मुख्य लेख: सम्राट अशोक जयंती
चैत्र शुक्ल अष्टमी रोजी दरवर्षी भारतामध्ये चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती साजरी केली जाते. बिहार सरकारने २०१६ मध्ये १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशीच ‘अशोक जयंती’ असल्याचा शोध घेऊन साजरी केली होती. ४ एप्रिल २०१७ मध्ये सम्राट अशोकांची २,३२१ वी जयंती साजरी करण्यात आली. हे तीनही दिवस भारतीय तिथीनुसार चैत्र शुक्ल अष्टमी आहेत.

Devashish Govind Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
RNI:- MPBIL/25/A1465
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
RNI NO : DELHIN/2005/15378
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015

0
421 views

Comment