क्षेत्र तारकेश्वर गडावर चारा टंचाई; राजाळे व अकोलकर मित्र परिवाराकडून १२ टन चारा सुपूर्द
क्षेत्र तारकेश्वर गड, महिंदा येथे श्रीसंत गुरुवर्य ह.भ.प. आदिनाथ महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे २५० गायींचे संगोपन केले जाते. मात्र, सध्या महाराज आजारी असल्यामुळे गडावरील गोशाळेत चाऱ्याची मोठी कमतरता भासत असल्याची माहिती समोर आली होती. ही बाब समजताच स्व. राजाभाऊ राजाळे मित्र परिवार व विष्णुपंत अकोलकर मित्र परिवार यांनी तत्परतेने मदतीचा हात पुढे केला आहे.
गडावरील चारा टंचाईबाबतची माहिती मिळताच रात्रीत संपर्काची चक्रे फिरली. त्याअनुषंगाने आज सकाळीच गडावर दोन ट्रॅक्टर ऊस आणि एक ट्रॅक्टर मका असा एकूण १२ टन चारा पोहोचवण्यात आला. संकटाच्या काळात गोमातेच्या सेवेसाठी धावून आलेल्या या मित्र परिवाराचे भाविकांकडून कौतुक होत आहे.
हा चारा सुपूर्द करताना मा. सभापती विष्णुपंत अकोलकर, बंडू पठाडे, शिवाजी मोहीते, देविदास माने, शिवाजी सरगर, पाराजी पाटील ससे यांसह अनेक मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"गोसेवा हाच खरा धर्म आहे. गडावर चाऱ्याची गरज असल्याचे समजताच सर्व मित्रांनी एकत्र येऊन ही मदत पोहोचवली आहे," असे यावेळी उपस्थितांनी सांगितले.