मध्यस्थाने लांबवले कापूस व्यापाऱ्याचे पावणेपाच लाख
जामनेर : शेतकऱ्याला द्यावयाची कापसाची पावणेपाच लाखांची रक्कम मध्यस्थाने लांबविल्याचा प्रकार पळासखेडे काकर (ता. जामनेर) येथे घडला. याबाबत फत्तेपूर पोलिसात देऊळगाव गुजरी येथील शरीफ पठाण याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रतन भाऊसिंग राठोड (रा. आभोणातांडा, ता. चाळीसगाव) हे १२ मार्च रोजी योगेश चव्हाण, बाळू राठोड, शरीफ पठाण (रा. देऊळगाव गुजरी) व रऊफ कुरेशी (रा. वाघारी, ह.मु. जामनेर) यांच्या मध्यस्थीने पळासखेडे काकर येथील शेतकरी प्रेमराज मोहन राठोड यांच्याकडे कापूस खरेदीसाठी गेले. ६४ क्विंटल कापूस मोजून वाहनात भरल्यानंतर कापसाचे ४ लाख ७० हजार ४७० रुपये प्रेमराज राठोड यांना देण्यासाठी जात होते. त्याचवेळी शरीफ पठाण व रऊफ कुरेशी यांनी ते पैसे स्वतःकडे ठेवून ते निघून गेले. प्रेमराज राठोड यांनी व्यापारी रतन राठोड यांच्याकडे मोजलेल्या कापसाची रक्कम मागितली. यावर रतन यांनी रक्कम पठाण व कुरेशी यांना दिल्याचे सांगितले. जोपर्यंत कापसाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत कापसाचे वाहन जाऊ देणार नाही, अशी भूमिका प्रेमराज राठोड यांनी घेतली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. यानंतर योगेश चव्हाण व बाळू राठोड यांनी पठाण व कुरेशी यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र फोन बंद होता.
१४ मार्चपर्यंत दोघांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने फत्तेपूर पोलिसात शरीफ पठाण (रा. देऊळगाव गुजरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.