श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांची चढ-उतार न करण्याचा निर्णय
पुणे : पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील फळभाजी तसेच कांदा-बटाटा विभागातील कामगारांनी ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या शेतीमालाच्या पोत्यांची चढ-उतार न करण्याचा निर्णय घेतला आहे.१० मार्चपासून हा निर्णय अमलात आणण्याची घोषणा कामगार संघटनेने केली आहे.
आंतरराष्ट्रीय कामगार संघटना, केंद्र व राज्य शासन, कामगार आयुक्त कार्यालय तसेच बाजार समितीने यापूर्वीच परिपत्रकाद्वारे ५० किलोपेक्षा जास्त वजनाचे पोते भरू नयेत, असा नियम लागू केला होता. मात्र मागील आठ वर्षांपासून हा निर्णय प्रत्यक्षात अंमलात आलेला नाही, अशी कामगारांची तक्रार आहे.
यासंदर्भात मार्केट यार्डमधील कामगार, वारणार, भरणार, तोलणार तसेच महिला कामगारांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या पोत्यांची चढ-उतार न करण्याचा ठराव करण्यात आला. या संघटनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कामगारांच्या मते, ६५ ते ७५ किलो वजनाच्या पोत्यांमुळे कामगारांना मान, पाठ व गुडघेदुखीचा गंभीर त्रास होतो. तसेच टंगूस बारदानामुळे लोखंडी हुक सटकल्यास दुखापतीही होतात. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा विचार करून शासनाने ठरवलेला ५० किलो वजनाचा नियम काटेकोरपणे लागू करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.