एसटी प्रशासनाचा यू-टर्न; सवलतींसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक नाही;
आधार किंवा जुन्या ओळखपत्रावरच तिकीट सवलत सुरूच; एनसीएमसी केवळ सुविधा, सक्ती नाही
राज्यातील एस.टी प्रवाशांसाठी दिलासा देणारी महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. एस.टी महामंडळ प्रशासनाने सवलतीच्या प्रवासासाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एनसीएमसी) सक्तीचे नसल्याचे स्पष्ट करत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच आधार कार्ड किंवा महामंडळाने दिलेल्या जुन्या ओळखपत्रावर सवलतीच्या दरात तिकीट मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून सवलतीच्या तिकिटासाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याच्या बातम्या आणि पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि इतर सवलतधारक प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ प्रशासनाने अधिकृत भूमिका स्पष्ट केली आहे. एनसीएमसी कार्ड ही केवळ डिजिटल व्यवहार सुलभ करण्यासाठी सुरू करण्यात आलेली सुविधा आहे. या कार्डमुळे प्रवाशांना रोख रक्कम न वापरता तिकीट खरेदी करता येते आणि भविष्यात इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांमध्येही एकाच कार्डचा वापर करण्याची सोय उपलब्ध होऊ शकते. मात्र सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य करण्यात आलेले नाही.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ज्यांच्याकडे एनसीएमसी कार्ड उपलब्ध नाही, त्यांना आधार कार्ड, शासकीय मान्यताप्राप्त ओळखपत्र किंवा महामंडळाने पूर्वी दिलेले सवलत ओळखपत्र दाखवून तिकीट सवलतीसह मिळेल. वाहकांकडे असलेल्या ईटीआयएम यंत्रणेद्वारे ओळखपत्राची नोंद करून तिकीट देण्याची प्रक्रिया पूर्ववत सुरू राहील.
सध्या एसटीकडून महिलांना पन्नास टक्के सवलत, ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेअंतर्गत मोफत प्रवास तसेच विद्यार्थी, दिव्यांग, स्वातंत्र्यसैनिक आदींसह विविध प्रवर्गांना सवलती दिल्या जातात. या सर्व सवलती पूर्वीप्रमाणेच लागू राहतील, असेही प्रशासनाने नमूद केले आहे.
दरम्यान, डिजिटल व्यवहारांना चालना देण्याच्या उद्देशाने एनसीएमसी कार्डचा प्रचार आणि प्रसार केला जात असला, तरी ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. प्रवाशांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांवरच भरोसा ठेवावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
या स्पष्टीकरणानंतर सवलतीच्या प्रवासाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून एसटी प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.