मुदत संपणाऱ्या ७८३ ग्रामपंचायतींवर आता विद्यमान सरपंच असेल प्रशासक
राज्यातील ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे किंवा २८ फेब्रुवारी २०२६ पर्यंत संपणार आहे, अशा ग्रामपंचायतींच्या राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्रशासकीय अडचणींमुळे निवडणुका होऊ न शकल्याने आता या ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंचाचीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे आता जळगाव जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५९ मधील कलमान्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून शासनाने हे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्याही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रदान केले आहेत. यापूर्वी २३ जानेवारी २०२६ रोजी या संदर्भात निर्गमित करण्यात आलेले पत्र रद्द करून आता नवीन नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाची सहा महिन्यांच्या कालावधीसाठी किंवा निवडणुका पूर्ण होईपर्यंत प्रशासक म्हणून नियुक्ती केली जाईल. ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी विद्यमान उपसरपंच आणि सदस्यांची एक प्रशासकीय समिती स्थापन होईल.