मुुरूड जंजिरा तालुक्यातील तेलवाडे ते नांदगाव दरम्यान विजयी विघ्नेश दादा माळी यांची भव्य रॅली उत्साहात
अगरदांडा / साकिब गजगे , नुकत्याच ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या अलिबाग जिल्हा परिषद निवडणुकीत नांदगाव ते सावळी गणातून विक्रमी मतांनी विजयी झालेले लोकप्रिय युवा नेते विघ्नेश दादा माळी यांची आज तेलवाडे (ता. मुुरूड जंजिरा) येथून नांदगावपर्यंत भव्य आणि जल्लोषपूर्ण विजय रॅली काढण्यात आली.
या रॅलीला कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आणि “विघ्नेश दादा माळी आगे बढ़ो, हम तुमारे साथ है” तसेच “विघ्नेश दादा माळींचा विजय असो” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
तेलवाडे गावातून सुरू झालेली ही रॅली मार्गातील विविध ठिकाणी थांबत ग्रामस्थांच्या शुभेच्छा स्वीकारत नांदगाव येथे मोठ्या जल्लोषात समाप्त झाली. अनेक ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून आणि हार घालून विघ्नेश दादा माळी यांचे स्वागत केले.
यावेळी बोलताना विघ्नेश दादा माळी यांनी मतदारांचे आभार मानत सांगितले की, “हा विजय माझा नसून जनतेचा आहे. नांदगाव सावळी गणाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कायम कटिबद्ध राहीन आणि जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही.”
या विजय रॅलीमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे