विद्यार्थ्यांच्या नेतृत्वातून ‘श्री गुरुजी’ जयंती उत्साहात साजरी
पिंपळगाव सराई (ता. बुलढाणा), दि. १३ फेब्रुवारी २०२६ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर (श्री गुरुजी) यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे विजया एकादशीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण नियोजन व सादरीकरण इयत्ता ९ (अ) मधील विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तीने आणि जबाबदारीने पार पाडले.
विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुणांची जडणघडण व्हावी, त्यांच्यात संघटनकौशल्य आणि वक्तृत्वविकास घडावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इयत्ता ९ (अ) मधील कु. समृद्धी उमेश देशमाने तर प्रमुख वक्ते म्हणून श्रीकांत रमेश लोखंडे यांनी भूमिका पार पाडली. व्यासपीठावर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे, पर्यवेक्षक संजय पिवटे तसेच कार्यक्रमाचे आयोजक अविनाश असोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते श्री गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. सूत्रसंचालनाची धुरा कु. प्रगती अनिल शिंदे व कु. समृद्धी प्रकाश खबुतरे यांनी समर्थपणे सांभाळली. प्रमुख वक्ते श्रीकांत लोखंडे यांनी आपल्या भाषणातून श्री गुरुजींच्या जीवनकार्याचा आढावा घेत देशभक्ती, संघटनकौशल्य आणि नेतृत्वगुणांचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात कु. समृद्धी देशमाने यांनी त्यांच्या जीवनातील विविध प्रसंगांचा उल्लेख करत त्याग, समर्पण आणि कार्यनिष्ठेचे महत्त्व स्पष्ट केले.
प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी विजया एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व सांगून श्री गुरुजींच्या आध्यात्मिक योगदानाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय जाणीवा व सामाजिक बांधिलकी दृढ होते, असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता ९ (अ) मधील प्रतीक रमेश सुरडकर यांनी केले. आयोजक अविनाश असोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे केली.
विद्यालयातील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ‘पसायदान’ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.