logo

विवरे येथे कवयित्री सुनिता सुरवाडे यांच्या काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा

जळगांव दिनांक
१०/०२/२०२६
(प्रतिनिधी आरिफ खान )
मराठी साहित्याच्या दालनात दोन दर्जेदार काव्यसंग्रहांची भर पडली असून, शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल, विवरे येथे दिनांक ९ फेब्रुवारी २०२६ सोमवार रोजी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुनिता सुरवाडे उर्फ विजयसुता यांच्या ‘मूक सावलीची साथ’ व ‘भावना एक सागर’ या काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला. साहित्य, शिक्षण व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील (अध्यक्ष – गोदावरी फाउंडेशन, जळगाव) होते. तर रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र आठवले यांच्या शुभहस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून किरण प्रकाश (सुप्रसिद्ध कवी, पुणे), प्रा. नीता पाटील (सामाजिक कार्यकर्त्या, जळगाव), सौ. संध्या भोळे (उपशिक्षिका), ॲड. निखिल पाटील, ॲड. विजय चौधरी, ॲड. समीर वाल्हे, अभय शिंदे, वासुदेव नरवाडे (माजी सरपंच, विवरे), सुभाष नरवाडे (पोलीस निरीक्षक, झारखंड) आदी मान्यवर उपस्थित होते.

दीपप्रज्वलन तसेच रमाबाई आंबेडकर, राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल व कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. मान्यवरांच्या स्वागत-सत्कारानंतर काव्यसंग्रहांचे प्रकाशन पार पडले.

यावेळी कवयित्री सुनिता सुरवाडे यांनी आपल्या काव्यप्रवासाविषयी मनोगत व्यक्त करत लेखनाच्या प्रेरणा व अनुभव मांडले. कवयित्री सौ. संध्या भोळे यांनी विद्यार्थ्यांना “लिहिते-वाचते व्हा, छोट्या कविता व छोट्या गोष्टी लिहित राहा” असे प्रेरणादायी आवाहन केले. वासुदेव नरवाडे यांनी गावाला प्रतिभावंत कवयित्री लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
ॲड. निखिल पाटील यांनी “सुशिक्षित, सुसंस्कृत व नीतिमत्तेने उभी असलेली ताकदीची स्त्री” अशा शब्दांत कवयित्रींचा गौरव केला. सुप्रसिद्ध कवी किरण प्रकाश यांनी दोन्ही काव्यसंग्रहांची साहित्यिक दृष्टीने भरभरून प्रशंसा केली.
डॉ. राजेंद्र आठवले यांनी “शिक्षिका आणि कवयित्री यांचा दुग्धशर्करा योग जुळून आला आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

अध्यक्षीय भाषणात डॉ. उल्हास पाटील यांनी काव्यसंग्रहातील निवडक ओळी वाचून त्यावर अभ्यासपूर्ण भाष्य केले. तसेच “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास संस्थेचे सचिव केशव राणे, संचालक रामचंद्र देशमुख, वसंत राणे, किरण पाचपांडे, संचालिका श्रीमती संगीता पाचपांडे, मुख्याध्यापक पी एच वायकोळे पर्यवेक्षक रवींद्र कोल्हे ज्येष्ठ शिक्षक शरद येवले प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली बेंडाळे तसेच विजय सुरवाडे, आशा सुरवाडे, कु. प्रज्ञा सुरवाडे, अनिल सुरवाडे, संजय सुरवाडे, कवयित्रींचे आप्तेष्ट,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका तेजल भिरुड यांनी केले, तर उपशिक्षिका पूनम राणे यांनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कैलास राणे, तेजस पाचपांडे , प्रतीक वारके , देवेंद्र फेगडे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांनी सहकार्य केले
===============

1
555 views