उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा सुनेत्रा अजित पवारांच्या कणखर निर्णयामुळे शरद पवारांचे 'मनसुबे' उदध्वस्त
उपमुख्यमंत्री पदाची शपथविधी सोहळा सुनेत्रा अजित पवारांच्या कणखर निर्णयामुळे शरद पवारांचे 'मनसुबे' उदध्वस्त !
सत्ता हे गिधाड्यांच्या घश्यात जाण्यापासून, फरफट होण्यापासून वाचवलं. राजा गेल्यावर या बुद्धिबळाच्या मास्टरने वेळ न घालवता डाव आपल्या हाती घेऊन राज्य वाचवलं. योग्य हाती सोपवलं. आणि त्यांच्यामागे सुद्धा खंबीरपणे उभे राहिले. सो कोल्ड वस्तादाच्या आणि त्याच्या पोरीच्या इच्छा - महत्वकांक्षा त्यांच्या घश्यात घातल्या.
अजित दादा जिथे असेल तिथे आता समाधानी असेल, रिलॅक्स असेल. योग्य माणूस आपल्या कुटुंबाच्या मागे उभा आहे, मित्र - भाऊ - काका - मार्गदर्शक होऊन काळजी घेईल हा विश्वास असेल.
----
पक्षाची वैचारिक भूमिका मांडताना, प्रचारसभेत भाषण करताना, निवडणुकीत काम करताना प्रफुल्ल पटेल नावाचे नेते कधी दिसत नाहीत. ‘अशा’ निर्णायक वेळी मात्र सगळी धुरा त्यांच्याकडे येते. मातीत राबणारे आणि पक्षाला विजय मिळवून देणारे आमचे दत्ता भरणे तेव्हा कुठे दिसत नाहीत!
महाराष्ट्रातल्या शेवटच्या सेंद्रीय नेत्याच्या पश्चात, त्याच्या पक्षाची सूत्रे चक्क नरेश अरोरा यांच्या हातात जावीत, हे आजचे राजकारण आहे! राजेशाहीच्या काळात वारस ठरत होते, तसेच आज ठरणे आणि सोबतीला व्यवस्थापनाची, माध्यमाची अत्याधुनिक साधने असणे हे दुभंगलेपण भारतीय राजकारणाचे वैशिष्ट्य आहे.
मुळात, भारतीय राजकारणाची स्पेस आता आक्रसून गेली आहे. त्यामुळे इथे डाव टाकण्यालाही मर्यादा आहेत. त्यासाठी ‘लेव्हल प्लेइंग फिल्ड’ लागते. प्रफुल्ल पटेल अथवा सुनील तटकरे यांनी ज्या कथित खेळी सुरू केल्या आहेत, त्याचे कारण स्पष्ट आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना सोबत घेतले, तर पूर्ण पक्ष त्यांच्या ताब्यात जाईल. सर्वशक्तिमान अजित पवार आता नाहीत. त्यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार हेच विलीन झालेल्या पक्षाचा ताबा घेतील. मग तटकरे, पटेल, मुंडे, भुजबळ आणि प्रामुख्याने पार्थ यांनी करायचे काय?
पक्ष आणि घर यातली सीमारेषा धूसर असल्याने, घरचा ताण पक्षातही येतोच. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, सुनंदा पवार या तिघींचे परस्परसंबंधही तिथे येतात. माझाच मुलगा सिंहासनावर बसावा, यासाठी जिथे 'रामायण' आणि 'महाभारत' घडते, तिथे आता वेगळे काय घडणार आहे?
पण, हेही लक्षात घ्या. आपल्याकडे आजवर जेव्हा जेव्हा अपघाताने स्त्री सत्तेत आली, तेव्हा तेव्हा तिने अनपेक्षितपणे मोठा चमत्कार घडवल्याचे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे, सुनेत्रा आपल्या सोईच्या आहेत, असे आज ज्यांना वाटते, त्यांच्यासाठीही उद्या त्या गैरसोईच्या ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्याकडे घर सांभाळणार्या महिला साध्या वाटतात, पण संधी मिळते तेव्हा त्या भल्या भल्या राजकारण्यांना पुरून उरतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांना ‘अंडरएस्टिमेट’ करून चालणार नाही!
पण, हे जे राजकारण दिसते आहे, ते काय आहे? राजेशाहीची - सरंजामशाहीची मानसिकता, संविधानिक लोकशाही, एकपक्षीय वर्चस्वाने लोकशाहीची केलेली पायमल्ली, उद्योजक आणि राजकारणी यांचे नेक्सस, कुटुंब नि भाऊबंदकी, अत्याधुनिक व्यवस्थापन शैली आणि प्रभावशाली नवी माध्यमे या सगळ्या मिश्रणातून आकाराला आलेले आपले आजचे राजकारण फारच भयंकर वळणावर गेले आहे.
मुळात, पटेल आणि टीमला हे माहीत नाही की, पक्षाच्या विलिनीकरणाची चर्चा जी अचानक सुरू झाली, त्याचे बोलविते धनी वेगळेच होते. राज यांना कधी आपल्यासोबत घ्यायचे, कधी बिनशर्त पाठिंबा द्यायला सांगायचे आणि कधी तिकडे पाठवायचे, हे स्क्रिप्टेड असते. त्याचप्रमाणे दोन राष्ट्रवादी कधी वेगळ्या करायच्या आणि कधी एकत्र आणायच्या, हेही ठरवले गेले आहे. ते काही नरेश अरोरा ठरवणार नाहीत.
काही झाले तरी पटेल काही केंद्रात मंत्री होणार नाहीत. ती जागा सुप्रियांचीच आहे. प्रफुल्ल पटेलांच्या पक्षाचा अथवा त्यांचा उपयोग शून्य आहे. त्यांच्याकडे चेहरा नाही. जनाधार नाही. एक खासदार वगळता मोठे बळ नाही. राज्यात शिंदेंचे महत्त्व कमी करणे हे वगळता मोठी आवश्यकता नाही. शरद पवारांचा पक्ष सोबत येण्याचे फायदे मात्र तात्कालिक आणि दीर्घकालीन आहेत. शिवाय, त्यामुळे कोलकत्त्यासह देश पातळीवर जाणारा मेसेज त्याहून महत्त्वाचा आहे.
अदानी बारामतीत आले आणि महाविकास आघाडी सरकार पडले. अदानी परवा बारामतीत आले आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची घोषणा झाली. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी अमित शाह आवर्जून आले. त्यापूर्वी, 'हा अपघात आहे. राजकारण करू नका', असे कोलकत्त्याचा उल्लेख करून शरद पवारांनी सांगितले.
सांगितले नाही. वाचून दाखवले.
त्यांना हे कोणी लिहून दिले?
आपण विश्लेषण करत आहोत, ते अभिनेत्यांच्या अभिनयाचे.
संहिता लिहिणारे वेगळेच आहेत. त्यांच्या संहितेत काय आहे, त्यावर बरेच काही अवलंबून आहे.
कोण आहे मदारी?
कौन है डॉन?
या प्रश्नाचे उत्तर मलाही माहीत नाही. जे डॉन वाटताहेत तेच डॉन असतील, असेही नाही. पडद्यामागचे डॉन आणखी कोणी वेगळेच असतील.
आम्ही भारताचे लोकहो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे.
राजकारण तुमच्या-माझ्या हातातून कधीच निघून गेले आहे.
#र