
*ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधानांच्या ९ संकल्पांचा संदेश घेऊन दीपक शर्मा भंडाऱ्यात*
प्रेस नोट
भंडारा
*ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधानांच्या ९ संकल्पांचा संदेश घेऊन दीपक शर्मा भंडाऱ्यात*
*पानिपतच्या मातीपासून राष्ट्रभावनेपर्यंत, सायकलवरून दीपक शर्मांचा प्रेरणादायी संवाद*
विलास केजरकर भंडारा.
भंडारा:- पानिपत आणि महाराष्ट्र यांचे नाते इतिहासाच्या पानांत कोरले गेले आहे. पानिपतच्या युद्धात सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी शहीद झालेल्या मराठा सरदारांच्या रक्ताने पावन झालेली माती सोबत घेऊन हरियाणातील पानिपत येथील दीपक शर्मा महाराष्ट्रात आले आहेत. पानिपत येथून चारधाम यात्रेला प्रारंभ करून ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या ९ संकल्पांचा संदेश देशभर पोहोचविण्याचे मिशन घेऊन दीपक शर्मा २७ डिसेंबर रोजी सायकलवरून भंडाऱ्यात दाखल झाले.
दीपक शर्मा यांनी २५ मे रोजी पानिपत येथून सायकल यात्रेला सुरुवात केली. त्या दिवशी तापमान २७ अंश होते. मात्र मनातील देशभक्तीची ज्वाला इतकी तीव्र होती की सर्व अडचणी त्यांच्या जिद्दीपुढे तोकड्या ठरल्या. सुमारे १० हजार किलोमीटरची ही यात्रा त्यांना देशातील १५ राज्यांतून चारधाम, द्वारकाधीश, रामेश्वरम, जगन्नाथ पुरी आणि बद्रीनाथ येथे घेऊन जाणार आहे. ही यात्रा केवळ तीर्थयात्रा नसून राष्ट्रभावना, सामाजिक जाणीव आणि विकसित भारताच्या ९ संकल्पांचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
भंडाऱ्यात आल्यानंतर दीपक शर्मा यांनी नूतन कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या जीवनातील संघर्ष सांगताना त्यांनी नमूद केले की, हरियाणातील क्रीडांगणावर त्यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर ओळख निर्माण केली होती. आपला जवळचा मित्र नीरज चोप्राप्रमाणे देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र खेळादरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्यांची कारकीर्द थांबली. स्वप्न अपूर्ण राहिले, पण जिद्द कायम राहिली. खेळाच्या मैदानावर देशासाठी जिंकता आले नाही. आता जनजागृतीच्या माध्यमातून देशासाठी काहीतरी करण्यासाठी निघालो असल्याचे त्यांनी सांगितले.
दीपक शर्मा गावोगावी आणि शहरोगावी ऑपरेशन सिंदूरचा संदेश पोहोचवत आहेत. आज आपण मोकळ्या हवेत श्वास घेत आहोत, यामागे देशासाठी बलिदान दिलेल्या वीरांचे योगदान आहे, असे ते सांगतात. त्यांच्या यात्रेचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशभर पोहोचावा अशीही त्यांची अपेक्षा आहे.
या यात्रेदरम्यान दीपक जिथे जिथे पोहोचतात तेथे शाळांमधील विद्यार्थ्यांशी आणि युवकांशी संवाद साधतात. नूतन कन्या शाळेच्या प्राचार्या नीलू तिडके यांनी शाळेत त्यांचे स्वागत केले. यावेळी पालक सदस्य विजय नीचकवडे, देवलापार गो-अनुसंधान केंद्राचे डॉ. संजय एकापुरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक श्रीकांत सालवे, मनीष बिचवे, शिक्षक बेनीलाल चौधरी उपस्थित होते.
इयत्ता अकरावीतील विद्यार्थिनी मिताली रावते हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शिक्षक नदीम खान यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तर विद्यार्थिनी चैताली देशकर हिने आभार मानले. विद्यार्थिनींनी उत्साहाने प्रश्न विचारले, काहींनी दीपक शर्मा यांच्यासोबत छायाचित्रे काढली तर काहींनी त्यांचे स्वाक्षरी घेतली. भंडारावासीयांनी दीपक शर्मा यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या असून, अशा व्यक्ती समाजासाठी प्रेरणास्थान ठरतात, असे मत व्यक्त केले. ही यात्रा दृढ निश्चय आणि मजबूत इच्छाशक्ती असेल तर कोणतीही वाट अशक्य नसते हे अधोरेखित करते.
RNI:- MPBIL/25/A1465
Devashish Tokekar
VANDE Bharat live tv news Nagpur
Editor/Reporter/Journalist
Indian Council of press,Nagpur
Journalist Cell
All India Media Association
Nagpur District President
Delhi Crime Press
AD.Associate /Reporter
Contact no.
9422428110/9146095536
Head office:- plot no 18/19, flat no. 201,Harmony emporise, Payal -pallavi society new Manish Nagar somalwada nagpur - 440015