logo

विद्यापीठात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व गटचर्चा ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

जळगाव प्रतिनिधी – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभाग व ज्ञानस्रोत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि. २६ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्रात वीर बाल दिवसानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, सामूहिक वाचन व गटचर्चा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. या उपक्रमांमध्ये सुमारे ३०० विद्यार्थ्यांनी वाचनासाठी सहभाग नोंदविला.
विद्यार्थ्यांसाठी ज्ञानस्रोत केंद्रातर्फे अवांतर वाचनाची विविध पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. सोपान इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. जयदीप साळी, प्रा. पवित्रा पाटील, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. चंद्रशेखर वाणी, विजय आहेर, प्रवीण चंदनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वीर बाल दिवसानिमित्त मार्गदर्शन करताना कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी म्हणाले की, वीर बाल दिवस दरवर्षी २६ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. दहावे शीख गुरु श्री. गुरु गोबिंद सिंह महाराज यांचे सुपुत्र साहिबजादे जोरावर सिंह व साहिबजादे फतेह सिंह यांच्या अद्वितीय शौर्य, बलिदान व धर्मनिष्ठेच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. विद्यार्थ्यांमध्ये शौर्य, नैतिक मूल्ये, देशभक्ती व श्रद्धा निर्माण व्हावी, हा या दिवसाचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
यानंतर आयोजित कार्यक्रमात ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्रा. डॉ. चंद्रशेखर वाणी यांनी विद्यार्थ्यांना गटचर्चेचे नियम समजावून सांगत ग्रंथवाचनाचे महत्त्व विशद केले. तसेच अधिसभा सदस्य डॉ. ऋषिकेश चित्तम यांनी भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले.
भारतीय ज्ञान प्रणाली सक्षम युवक घडविण्यात समर्थ आहे का? ती जागतिक स्तरावर आपले स्थान निर्माण करत आहे का? भारत खरंच विकसित होत आहे का? अशा विविध विषयांवर गटचर्चा घेण्यात आल्या. या गटचर्चेत ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विजयी विद्यार्थ्यांना ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. कविता मनोहर पाटील व प्रा. योगेश माळी यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

9
650 views