निरा भिमा करखान्याचे 7 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सहकार्य करावे
-हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन
निरा भिमा करखान्याचे 7 लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सहकार्य करावे
-हर्षवर्धन पाटील यांचे आवाहन
•संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांचा रु. 3101 उच्चांकी उचलीबद्दल सत्कार
इंदापूर : प्रतिनिधी दि. 6/12/25
नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2025-26 च्या रौप्यमहोत्सव गळीत हंगामामध्ये प्रति टन रु. 3101 प्रमाणे उच्चांकी उचल ही विना कपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये शुक्रवारी जमा करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अधिकच्या ऊस दरासाठी चालू हंगामामध्ये 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, अशी आवाहन कारखान्याचे संस्थापक, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि. 5) केले.
शहाजीनगर (ता. इंदापूर) येथे नीरा भीमा कारखाना कार्यस्थळावर शेतकऱ्यांशी संवाद कार्यक्रमांमध्ये हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी कारखान्याच्या इतिहासामध्ये प्रथमच उच्चांकी अशी प्रति टन रु. 3101 प्रमाणे उचल जाहीर केलेबद्दल ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करीत, कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील यांचा संचालक मंडळासह सत्कार केला.
आगामी काळामध्ये नीरा भीमा कारखान्याचा समावेश हा राज्यातील सर्वोत्तम असलेल्या कारखान्यांमध्ये होईल, असा ठाम विश्वासही यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून कारखान्याचे कामकाज केले जात आहे. चालू गळीत हंगामामध्ये कारखान्याने 34 दिवसात 2 लाख मे. टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच कारखान्याचे तांत्रिक पॅरामीटर उत्कृष्ट असून, कारखान्याने मंगळवारी (दि. 2) एका दिवसात 6400 मे. टन ऊसाचे गाळप करून नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
कारखान्यामध्ये 4 वर्षांपूर्वी धाडसी निर्णय घेऊन झिरो मिल टाकण्यात आली, परिणामी सध्या प्रतिदिनी 3500 मे. टन गाळप क्षमता असतानाही सध्या 5600 ते 6000 मे. टन क्षमतेने व उच्च गुणवत्तेने गाळप केले जात आहे. कारखान्याला आर्थिक अडचण असतानाही, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून उच्चांकी रु. 3101 प्रमाणे उचल देण्याचा निर्णय घेतला आहे, असे हर्षवर्धन पाटील यांनी नमूद केले.
यावेळी कारखान्याच्या अध्यक्षा सौ.भाग्यश्री पाटील भाषणात म्हणाल्या, कारखाना उत्कृष्टपणे चालू असून इथेनॉल, सहवीज निर्मिती, सेंद्रिय खत प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्याबद्दल ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, अधिकारी, कर्मचारी वर्ग, हितचिंतक यांचे अभिनंदन केले. तसेच शेतकऱ्यांनी गुणवत्तेचा सर्व ऊस गळीतास देऊन सहकार्य करावे, त्यामुळे 7 लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्टे पूर्ण होऊन आगामी काळातही चांगला ऊस दर देणे शक्य होईल, असेही सौ.भाग्यश्री पाटील यांनी भाषणामध्ये नमूद केले.
प्रास्ताविक कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी केले. याप्रसंगी लालासाहेब पवार, विलासराव वाघमोडे, ज्ञानेश्वर वाघ, विलास ताटे देशमुख, नितीन शिंदे, नंदकुमार लावंड यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती प्रदीप पाटील, सुरेश मेहेर, दत्तू सवासे, दत्तात्रय शिर्के, विकास पाटील, प्रतापराव पाटील, धनंजय कोरटकर, मनोज पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, अमरदीप काळकुटे, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगिता पोळ, कल्पना शिंदे, तानाजी नाईक, शिवाजीराव शिंदे, रवींद्र जगदाळे, आबासाहेब शिंगाडे, सुभाष काळे उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे तर आभार उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे यांनी मानले.
•चौकट:
शेतकऱ्यांनी ऊस तोडणीसाठी घाई करू नये.- सौ. भाग्यश्री पाटील
-----------------------------------
चांगला दर देणाऱ्या कारखान्यांना ऊस देणेसाठी शेतकरी थांबतात, असा अनुभव आहे. त्यामुळे ऊसाला चांगला दर मिळणेसाठी शेतकऱ्यांनी ऊस तोडणीची घाई करू नये. शेतकऱ्यांचा एक टिपरू ऊस गळापा आभावी शिल्लक राहणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही कारखान्याच्या अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी यावेळी दिली.
•चौकट:-
जिल्हा बँकेकडून कारखान्याची अडवणूक
-----------------------------------
नीरा भीमा कारखान्याने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे रु. 50 कोटी रक्कमेचे अल्पमुदत इथेनॉल कर्ज मे महिन्यात मागितले होते. त्यावेळी कारखान्याकडे रु. 17 कोटीची रक्कम ही शेतकऱ्यांची देय ऊस बिल देणेसाठी उपलब्ध झाली होती. त्यावेळी बँकेने सांगितले की रु. 17 कोटीची कर्जाची रक्कम भरल्यास कारखान्याला रु. 50 कोटीचे सदरचे कर्ज देऊ. त्यानुसार कारखान्याने रु.17 कोटीची रक्कम बँकेकडे भरली. त्यानंतर सर्व अधिकाऱ्यांच्या शिफारशी होऊन बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये कारखान्यास रु.50 कोटी ऐवजी रु. 40 कोटी कर्ज मंजूर करण्यात आले. मात्र त्यानंतर बँकेने कारखान्यास कर्ज रक्कम देणेसाठी टाळाटाळ सुरू केली. त्यावेळी ज्येष्ठ नेते मा.शरदचंद्र पवारसाहेब यांनीही बँकेस फोन करून मंजूर कर्ज रक्कम कारखान्यास द्यावी, असा फोन केला. तसेच मीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्यक्ष भेटून मंजूर कर्ज देणे बाबत अनेकदा बोललो. तरीही कारखान्यास मंजूर कर्ज रक्कम देण्यात आली नाही. नंतर तब्बल दोन महिन्यांनी कारखान्याला पत्र पाठवून कर्ज देता येणार नाही असे कागदोपत्री कळविण्यात आले. याचवेळी निरा भीमा कारखान्यास कर्ज न देता जिल्ह्यातील इतर कारखान्यांना मात्र कर्ज देण्यात आले. जर कारखान्यास कर्ज देणार नव्हते तर रु. 17 कोटी रक्कम बँकेकडे भरणेऐवजी आम्ही शेतकऱ्यांची ऊस बिले त्यामधून दिली असती. जिल्हा बँकेकडून नीरा भीमा कारखान्याला कर्ज देणेबाबत अडवणूक करण्यात आल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.
__________________________
फोटो:-