logo

छत्रपती राजर्षी शाहू महाराज: सामाजिक न्यायाचे शूरवीर आणि शिक्षण क्रांतीचे प्रणेते-सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने अभिवादन..

छत्रपती राजर्षी शाहू महाराज: सामाजिक न्यायाचे शूरवीर आणि शिक्षण क्रांतीचे प्रणेते-सेवानिवृत्त केंद्रप्रमुख गोकुळ पाटील

कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात
राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने अभिवादन..

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
धार मालपूर (ता. अमळनेर) कै. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयात आज, 26 जून 2025 रोजी, प्रा. अशोक पवार यांच्या युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर अंतर्गत राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाच्या माध्यमातून छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 151 व्या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उमाकांत साळुंखे हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे आणि वक्ते म्हणून मा. केंद्र प्रमुख आबासाहेब गोकुळ आनंदा पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर. ए. पाटील सर यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन आणि सत्कार समारंभाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या योगदानावर वेगवेगळ्या भाषणांद्वारे प्रकाश टाकला. इयत्ता सातवीच्या हेमांगी शांताराम पाटील, भावना पाटील व इयत्ता आठवीच्या दिव्या रवींद्र पाटील व उन्नती केशव पाटील यांनी आपल्या भाषणातून शाहू महाराजांच्या जीवन सारथीची माहिती दिली.
प्रमुख पाहुणे श्री गोकुळ पाटील यांनी भाषणात शाहू महाराजांचा उल्लेख करत म्हटले, “हजारो राजे झाले, पण माणसांतला राजा आणि रयतेचा राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज. त्यांनी त्यांच्या राज्यात सामाजिक आरक्षणाची सुरुवात केली, अस्पृश्यतेचा नाश केला, शिक्षणाचा प्रसार केला आणि माणसाठी न्यायाचा मार्ग मोकळा केला.” त्यांनी शाहू महाराज यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक क्षेत्रातील क्रांतिकारक कामांचा सविस्तर आढावा घेतला.
शाहू महाराजांनी 48 वर्षे जीवनात 24 वर्ष राज्य केले. त्यांनी आपल्या साम्राज्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, स्त्री शिक्षणाचा प्रसार केला आणि अस्पृश्यतेविरुद्ध कडक प्रयत्न केले. अस्पृश्यांना सरकारी नोकर्‍या, राखीव जागा आणि समान अधिकार दिले. शाळा, दवाखाने, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी सुद्धा समानतेचा आदेश दिला. विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली व देवदासी प्रथा समाप्त करण्यासाठी कायदे काढले.
राजर्षी शाहूंनी कोल्हापूरमध्ये विविध सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले - स्पिनिंग अँड विव्हिंग मिल, व्यापारपेठा, सहकारी संस्था, राधानगरी धरण उभारणी, शेतीसाठी संशोधन केंद्र यांची स्थापना केली. त्याचबरोबर कला, संगीत, कुस्ती यासारख्या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत शाहू महाराजांचे सखोल संबंध होते. मूकनायक साप्ताहिकाला मदत करणे हा त्यांचा समाजासाठीचा आदर्श कार्य होता. राजर्षी शाहूंनी समतेवर आधारित राज्य निर्माण केले होते, ज्यामुळे जातीयवादी विरोधकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, पण लोकांचे प्रेम आणि न्याय यामुळे ते सुरक्षित राहिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. शाळेचे शिक्षक आर. ए. पाटील, डी. ए. पाटील, एस. ए. पाटील, क्षिरसागर सर, सुनंदा पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. आभार श्री एम. व्ही. पाटील सर यांनी मानले.
या जयंतीदिनी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या सामाजिक समतेसाठी असलेल्या अमूल्य योगदानाचा स्मरण करून त्यांच्या आदर्शांचा पाठपुरावा करण्याचा संकल्प अनेकांनी व्यक्त केला.


1
398 views