logo

सिबिल अहवालाच्या कारणाने शेतकऱ्यांना लाभापासून वंचित ठेवू नका" आमदार प्रशांत बंब यांनी बँक अधिकाऱ्यांना ठणकावले

गंगापूर (प्रतिनिधी मुन्नाभाई) : "शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकांनि संवेदनशीलतेने निर्णय घ्यावेत. केवळ सिबिल अहवाल खराब असल्याचे कारण देत शेतकऱ्यांना सौरऊर्जा प्रकल्प किंवा पीक कर्ज नाकारणं योग्य नाही," असा ठाम संदेश आमदार प्रशांत बंब यांनी बँक व्यवस्थापकांना दिला. पंचायत समितीच्या सभागृहात २ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या बँक व्यवस्थापक समितीच्या बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत गंगापूर तालुक्यातील विविध बँकांचे शाखा व्यवस्थापक, शेतकरी प्रतिनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या समस्या आणि बँकांकडून होणारी अडवणूक यावर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत अनेक शेतकऱ्यांनी आपले अनुभव मांडताना सांगितले की, सरकारकडून सौरऊर्जा प्रकल्पांसाठी अनुदान दिलं जात असतानाही बँकांकडून केवळ सिबिल स्कोअरच्या आधारावर कर्ज नाकारलं जातं, त्यामुळे आम्ही योजनांपासून वंचित राहतो.

यावर आमदार बंब यांनी स्पष्ट शब्दांत बँक व्यवस्थापकांना उद्देशून सांगितले की, "सिबिल स्कोअरचा संदर्भ घेत शेतकऱ्यांना कर्ज नाकारणं चुकीचं आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय द्या. सरकारच्या विविध योजनांचा लाभ खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकांनी सहकार्य करणे अत्यावश्यक आहे."आमदार प्रशांत बंद साहेब ते पुढे म्हणाले, "काही शेतकरी कमी अधिक थकबाकीमुळे सिबिलमध्ये खराब नोंदीत गेले असले तरी त्यांची नियत आणि गरज योग्य आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना बँकांनी विश्वासपूर्वक कर्ज द्यावं आणि त्यांच्या प्रगतीस हातभार लावावा."बैठकीला तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय, महाराष्ट्र ग्रामीण बँक, आयसीआयसीआय बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, बँक ऑफ महाराष्ट्र आदी बँकांचे प्रतिनिधी तसेच अनेक शाखा व्यवस्थापक उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या वतीने दिपक बडे, लक्ष्मण भुसारे, प्रदीप पाटील, मारुती खैरे, भाग्येश गंगवाल, सचिन विधाटे, अमोल जाधव, राजेंद्र राठोड, दिपक साळवे, आप्पासाहेब पाचपुते, अनिल घुगे, रज्जाक पठाण, गोपाल वर्मा, कृष्णकांत व्यवहारे, अतुल रासकर, महेश गुजर, अण्णासाहेब जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

27
1786 views