
वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; भंडाऱ्याच्या खैरीपट गावातील घटना*
*वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; भंडाऱ्याच्या खैरीपट गावातील घटना*
रब्बी आणि उन्हाळी पिकांना पाणी देण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकऱ्यावर झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला करून त्यांना ठार केलं. ही घटना आज 31/3/2025 सकाळी भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट शेतशिवारात उघडकीस आली. डाकराम देशमुख (४०) असं वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नावं आहे. डाकराम यांच्या शेतात मका पिकासह उन्हाळी भात पिकाचीही लागवड करण्यात आली आहे.
या पिकांना पाणी देण्याकरिता ते काल सायंकाळी शेतात गेले होते. मात्र, रात्र होऊनही ते घरी परत नं आल्यानं कुटुंबीयांनी वन विभागाच्या पथकासह त्यांचा शोध घेतला असता आज सकाळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केल्यानं छिन्नविच्छिन्न अवस्थेतील त्यांचा मृतदेह त्यांच्याचं मका पिकाच्या शेतात आढळून आला. मागील १५ दिवसांपासून या परिसरामध्ये पट्टेदार वाघाचं अस्तित्व आढळून येत असून त्याचा बंदोबस्त लावण्याकरिता वन विभागाचं पथक दिवस - रात्र गस्तीवर असताना ही घटना घडल्यानं ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष बघायला मिळतोय.