शेतातून काम करून घरी परत येणार्या महिलेचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील महालखेडा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव महाराष्ट्र शिवारात घडली आहे.
या संदर्भातील माहिती अशी की, महालखेडा येथील रहिवासी मालताबाई मनोज खाडे ( वय अंदाजे ३७ ) या आपल्या शेतात काम करण्यासाठी सकाळी गेल्या होत्या. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्या शेतातील काम आटोपून घरी येत होत्या. दरम्यान, शिवारातच कुणी तरी अज्ञात व्यक्तीने दगडाने ठेचून त्यांचा खून करून पलायन केले. मालताबाई घरी न आल्यामुळे कुटुंबिय शेताकडे गेले असता सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी पथकाला रवाना केले. या पथकाने महिलेचे पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठवत तपासाची चक्रे फिरवली आहेत. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे