महाराष्ट्रात उष्माघाताने मृत्यूंचे प्रमाण वाढले
महाराष्ट्र : राज्यात उष्णतेच्या लाटेमुळे तापमानाचा नवा उच्चांक नोंदविला गेला असून वर्ध्याने तापमानात नवीन विक्रम केला आहे. विदर्भ भागात उष्माघातामुळे अनेक लोक बेशुद्ध पडले आणि काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तिघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय आहे. यशोधरानगर परिसरातील 58 वर्षीय, 60 वर्षीय व्यक्ती आणि गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला 65 वर्षीय पुरुष बेशुद्ध अवस्थेत आढळले आणि रुग्णालयात मृत घोषित झाले. मृत्यूचे नेमके कारण पोस्ट मॉर्टमनंतर स्पष्ट होणार आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा गावात 6 वर्षीय अनवी अनाडी भोसले या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. गावात पाण्याची टंचाई असल्यामुळे तिला अर्धा किलोमीटर चालून पाण्यासाठी जावे लागले. तिचा मृत्यू उष्माघातामुळे किंवा पाणी टंचाईमुळे झाला याचा संशय व्यक्त केला जात आहे. या गावातील प्रत्येक घरासमोर नळ कनेक्शन असूनही पाणी मिळत नाही. 8 दिवसांनंतरच पाणी पुरवठा होतो. मृत्यूच्या तपासासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे.
लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी गावात 55 वर्षीय लक्ष्मण कांबळे यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कामावरून घरी परतताना त्यांना चक्कर येऊन कोसळल्यावर त्यांचा मृत्यू झाला. सध्या या मृत्यूचेही कारण तपासले जात आहे.