मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा जागीच मृत्यू
शहापूर /साजिद शेख
मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाक्याजवळ शनिवारी सकाळी दुचाकी आणि कंटेनरमध्ये झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यु झाला. या दाम्पत्याचे नुकतेच लग्न झाले होते. यातील महिलेची आई आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी दोघे डोंबिवलीत गेले होते. तेथून पुन्हा घरी परतत असताना हा अपघात झाला असून या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कल्पेश रेवाळे (३०) आणि त्यांची पत्नी मिनाक्षी रेवाळे (३१) या दाम्पत्याचा अपघातात मृत्यु झाला असून हे दाम्पत्य भांडूप परिसरात राहत होते. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. कल्पेश हा एचडीएफसी बँकेच्या अंधेरी शाखेत तर, त्याची पत्नी मिनाक्षी या ॲक्सीस बँकेच्या कलिना शाखेत नोकरी करत होत्या. मिनाक्षी यांची आई डोंबिवली परिसरात राहत असून ती आजारी आहे.
यामुळे कल्पेश आणि मिनाक्षी हे दोघे त्यांना भेटण्यासाठी शुक्रवारी डोंबिवलीत दुचाकीने गेले होते. त्यांनी आईच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यादिवशी त्यांनी तिथे मुक्काम केला. शनिवारी सकाळी ते दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. कल्पेश हे दुचाकी चालवित होते तर, मिनाक्षी या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या होत्या.मुंबई-नाशिक महामार्गावरून ते मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी खारेगाव टोलनाक्याजवळ त्यांच्या दुचाकीला कंटनेरची धडक बसली आणि या अपघातात कंटेनरच्या चाकाखाली येऊन दोघांचा जागीच मृत्यु झाला. सकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलिस तसेच वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कंटेनरचालक शिव कुमार सिंग याला ताब्यात घेतले. याप्रकरणी कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.