मुंबई नाशिक महामार्गावर बैलगाड्यांना भरधाव वाहनाची धडक भीषण अपघातात महिलेचा मृत्यू 8 जण जखमी दोन बैल ठार
घोटी येथून वज्रेश्वरी येथील यात्रेसाठी निघालेल्या आठ ते नऊ बैलगाड्यांच्या ताफ्याला मागून भरधाव येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघात एका महिलेचा मृत्यू तर आठ जण जखमी झाले आहेत. पिकअप वाहनाची धडक इतकी जोरदार होती की या अपघातात दोन बैल जागीच ठार झाले असून चार बैल जखमी झाले आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर कळमगाव हद्दीत रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. पिकअप चालक फरार झाला असून शहापुर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
इगतपुरी तालुक्यातील घोटी येथून वज्रेश्वरी येथील यात्रेला काहीजण बैलगाडी मधून निघाले होते. आठ – नऊ बैलगाड्यांचा ताफा नाशिक – मुंबई मार्गाने रात्री जात असताना मागून येणाऱ्या पिकअप वाहनाने बैलगाड्यांच्या ताफ्याला जोरदार धडक दिली. यामध्ये सुरेखा आडोळे (४७) यांचा जागीच मृत्यू झाला असून वैभव गिते, सचिन आडोळे, फुलचंद आडोळे, शुभम लहाने, देविदास भगत, जनाबाई भगत, वैभव भगत आणि मांगीलाल असे आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमी घोटी भागातील रहिवासी असून त्यांच्यावर शहापुर उपजिल्हारुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघातात दोन बैल ठार आणि चार बैल जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातानंतर पिकअप चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.