
नरेगा अंतर्गत पाणंद रस्त्यांवरील ‘दहा कामांची मर्यादा’ लवकरच हटणार
मंत्री भरत गोगावले यांची नवी दिल्लीत निर्णायक बैठक....
ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मातोश्री ग्रामसमृद्धी’ पाणंद रस्ता कामांवरील ‘दहा कामांची मर्यादा’ लवकरच हटवण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने या प्रस्तावाला तत्त्वतः मंजुरी दिली असून, त्यामुळे राज्यातील कामांना मोठी गती मिळणार आहे.
राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी केंद्रीय ग्राम विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली. या बैठकीत पाणंद रस्त्यांवरील कामांच्या संख्येवरील मर्यादा हटवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. केंद्रीय मंत्री चौहान यांनी ही मर्यादा पूर्णपणे उठवण्यास तातडीने सहमती दर्शवली असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना
या निर्णयामुळे राज्यभर पाणंद रस्त्यांची प्रलंबित कामे वेगाने सुरू होतील. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत जलद आणि सुरक्षितरित्या पोहोचवणे सुलभ होईल.
वाहतूक खर्चात घट
शेतमालाचे नुकसान कमी
गावांच्या दळणवळण व्यवस्थेत सुधारणा
रोजगाराच्या नव्या संधी
मंत्री गोगावले यांनी विश्वास व्यक्त केला की, या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस हातभार लागेल.